कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी
कौशल्य विकास कार्यक्रमावर भर
नागपूर, दि.25 : कुशल मनुष्यबळाची उद्योगक्षेत्राची मागणी आणि युवकांसाठी विविध रोजगार संधी यांचा समन्वय साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तुली इम्पेरियल येथे एचडीएफसी बँक यांच्यावतीने कौशल्य विकास केंद्राच्या दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, एचडीएफसी बँकेच्या सीएसआर विभागप्रमुख नुसरत पठाण, ‘फ्युएल’चे केतन देशपांडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोजगाराच्या संधी स्विकारलेल्या युवकांना मान्यवरांच्या हस्ते ‘ऑफरलेटर’ प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री यांच्या हस्ते ज्ञानदान या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री म्हणाले, भारत हा युवकांचा देश असून देशाच्या प्रगतीसाठी ही एक मोठी संधीही उपलब्ध आहे. युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना देणे शक्य असून याद्वारे देशाची सर्वांगिण प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. आज उद्योग - व्यवसाय क्षेत्रात कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. याकरिता स्किल इंडियासारखे उपक्रम सुरु करण्यात आले असून युवकांना याद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मुद्रा योजनेद्वारेही तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. करियर मार्गदर्शन हे महत्वपुर्ण क्षेत्र असून आपली क्षमता ओळखुन युवकांनी ‘करियर’ निवडावे. यासाठी करियर मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरतात. युवकांनी आपल्यातील क्षमतांचा अंदाज घेऊन योग्य ‘करियर’ निवडावे असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
एचडीएफसी बँकेच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रातून नागपूरच्या तीन हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. बँकेकडून तेरा हजार तरुणांना करियर समुपदेशन देण्यात आले. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Comments
Post a Comment