Sunday, May 31, 2020

रूग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोविड वॉर्डाला भेट पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस


 

        



जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.

        गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी काल सायंकाळी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.

 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र मेहनत जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता  काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत:  पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती या सर्व रूग्णांनी दिली.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच रूग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत.

आढळलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रूग्णांवर याच रुग्णालयातून उपचार होऊन ते बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहेत. डॉक्टर व त्यांची टीम या रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.  आपण कोविड रुग्णालयातील प्रत्येक दाखल व्यक्तीला भेटून विचारपूस केली आहे.  प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे. रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणा रूग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

 

                                    000

 

 

 


Saturday, May 30, 2020

आगामी काळातील नियोजनाबाबत पालकमंत्र्यांकडून निर्देश



कोरोना प्रतिबंधासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊन परिपूर्ण  नियोजन करावे

-     पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 30 : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व जून महिन्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अपेक्षित मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्ह्यात व अमरावती शहरात स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन सुरक्षिततेसाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा व पुढील काळातील नियोजन ठरविण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबवत असताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास मुभा देण्यात आली. 31 मे नंतरच्या काळासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून नव्याने मार्गदर्शक सूचना प्राप्त होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात व विशेषत: अमरावती शहरात स्थानिक परिस्थिती, रुग्ण व संशयितांची संख्या, सतत सुरु असलेल्या सर्वेक्षणातून पुढे येणा-या बाबी आदींचा काटेकोर विचार करून नियोजन करण्यात यावे. परिसरनिहाय सूक्ष्म नियोजनातून अधिक अचूकपणे कार्यवाही व्हावी.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, सुरक्षित परिसरात नियमांचे पालन करून दुकाने, व्यवसाय आदी सुरु होऊन जनजीवन पूर्वपदावर येईल, असा प्रयत्नही आवश्यक आहे. मात्र, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स या बाबी पाळल्या गेल्याच पाहिजेत. त्यादृष्टीने टप्प्याटप्प्याने उद्योग- व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणे व दुसरीकडे सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची प्रत्येकाने अंमलबजावणी केली तरच ते शक्य होईल. अनेकदा काही ठिकाणी बेशिस्त दिसते. त्याला आळा घालण्यासाठी नियमितपणे प्रतिबंधक कारवाया करून शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध यंत्रणांच्या समन्वयातून प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व अमरावती शहरातील आरोग्य यंत्रणा अधिकाधिक अद्ययावत कशी करता येईल, याकडे लक्ष पुरवावे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रूग्णालये येथील यंत्रणा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेची व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यामुळे जून महिन्यासाठी स्थानिक स्थिती लक्षात घेऊनच विविध व्यवसायांना परवानगी आदी प्रक्रिया व्हावी. व्यवसायांना परवानगी देताना दिवस, वेळ, गर्दी टाळण्यासाठीचे उपाय आदी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांतील उद्योग, व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. त्यांना उभारी देण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. रोजगाराचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. त्यादृष्टीने विविध उद्योग-व्यवसाय सुरु करून जनजीवनात सुरळीतता आणणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षितताही जोपासली गेली पाहिजे. हे लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

अमरावती येथील ‘ब्रेनवायर आयटी’तर्फे स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन एक ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्याची माहिती संस्थेचे आकाश पालीवाल, समीर गांजरे यांनी दिली.  स्क्रिनिंग व नागरिकांना मार्गदर्शन यासाठी ते उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. याबाबत तिवसा नगरपंचायत स्तरावर डेमो घेऊन व उपयुक्तता तपासून पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय यावेळी झाला.

Thursday, May 28, 2020

ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी - गृह मंत्री अनिल देशमुख

गृह मंत्र्यांकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा





• कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा

• जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या

• आरोग्य सुविधा सज्ज ठेवा

 

अमरावती, दि. 28 :  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी यंत्रणांना आवश्यक सामग्री वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोलीस यंत्रणेलाही होमगार्ड आदी आवश्यक मनुष्यबळ मिळवून देण्यात येईल. कोरोनाचे ग्रामीण भागात संक्रमण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी मिळून विशेष दक्षता घेऊन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे दिले.  

  गृह मंत्री श्री. देशमुख यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंतराव वानखडे, विभागीय आयुक्त पियुष सिंह, पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक हरी बालाजी आदी उपस्थित होते.

            श्री. देशमुख म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात 39 कंटेन्मेंट झोन, अद्यापपर्यंत आढळलेले 190 रूग्ण आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होत आहेत. पीपीई किट, मास्क, ऑक्सिजन सिलेंडर आदी सामग्री यापूर्वीच  उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. ग्रामीण भागात संक्रमण होता कामा नये. पोलीस दलाला लागतील तेवढे होमगार्ड उपलब्ध करून दिले जातील. पोलीसांवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने केंद्रीय पोलीस दलाच्या कंपन्या मागविण्यात आल्या आहेत. एक कंपनी अमरावतीत आली आहे. पण अकोल्यात गंभीर स्थिती लक्षात घेता तिथे प्राधान्य द्यावे लागणार आहे. मात्र, अजून मनुष्यबळ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

             अकोला व अमरावती येथे अधिक गंभीर रूग्ण असल्यास त्यांना नागपूर येथे हलविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करता येते किंवा कसे, हे तपासण्यासाठी एक पथक नेमण्यात येत आहे. त्यांच्याकडून अहवाल मागवून त्यादृष्टीने निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

  कोरोनावर मात करण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्य हवे, असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, कोरोना संकटकाळात अनेक नवे प्रश्न उभे राहत आहेत.  प्रशासन अहोरात्र काम करत आहे. कामात अनेकदा त्रुटी राहू शकतात. त्या वेळोवेळी दुरुस्त करण्यात याव्यात. मात्र, प्रशासनाचे मनोबल टिकून राहिले पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून व प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. सर्वांच्या सहकार्यानेच आपल्याला या साथीवर मात करता येईल, असे आवाहन गृह मंत्र्यांनी केले.  

 

कोरोना प्रतिबंध उपाययोजनांत पोलीस आघाडीवर काम करत आहेत. हे लक्षात घेऊन सेवेतील वयाने 55 वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याची सूचना देण्यात आली आहे. वयाने 50 पुढे असलेल्यांना जनतेशी थेट संपर्क येईल, अशी कामे दिली जात नाहीत. पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. त्यांची काळजी घेण्यासाठी अनेक निर्णय घेतले जात आहेत. दक्षता साधने व प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप होत आहे. दुर्दैवाने कुणी मृत्युमुखी पडल्यास 10 लाख रूपये सानुग्रह अनुदानाचाही निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याबाबत जिल्ह्यातील कार्यवाहीचा आढावाही त्यांनी घेतला. कोविड हेल्थ सेंटर, डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व आरोग्य विषयक सुविधा सज्ज ठेवाव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

            जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारांना तत्काळ आळा घालावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.  परप्रांतीय कामगार बांधवांना रेल्वे, बसने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प. बंगालमधील चक्रीवादळाने तेथील कामगार बांधवांसाठी रेल्वे सोडता आली नाही. मात्र,  लवकरच त्यांना स्वगृही पोहोचविण्याचा निर्णय होईल. त्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

           कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात तीन टप्प्यांत सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातून लक्षणे आढळणा-या नागरिकांची तत्काळ तपासणी करण्यात आली. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांचे पथक गावोगाव नियुक्त करण्यात आले आहे. सर्व यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. येणा-या अडचणींचे तत्काळ निराकरण होत आहे. या काळात प्रशासनाचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात चांगले काम होत आहे. त्यांना विविध आवश्यक साधने मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.

 

                                    00000

 

विकास कामांसह रोजगारनिर्मितीला चालना - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुसरा



 

थोड्या कालावधीत जिल्ह्याची मोठी झेप

 

            अमरावती, दि. 28 : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असताना ग्रामीण नागरिकांना मनरेगातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार आजमितीला जिल्ह्यात 690 गावांतून 3 हजार 120 विविध कामे सुरू असून, 86 हजार 993 मनुष्यबळ रोजगारनिर्मिती झाली आहे. मनरेगा कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे.

ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी मनरेगातून अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात रोजगारनिर्मितीत भरीव वाढ झाली आहे. राज्यात आजमितीला मनरेगा कामांमध्ये भंडारा जिल्ह्यात 1 लाख 23 हजार 307 मनुष्यबळ उपस्थिती असून हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. त्याखालोखाल अमरावती जिल्ह्यातही गत महिनाभरात रोजगारनिर्मितीत लक्षणीय वाढ झाली आहे. आज सुमारे 86 हजार 993 मनुष्यबळ रोजगारनिर्मिती झाली आहे. कोरोना संकटकाळात लॉकडाऊन असताना ग्रामीण भागातील नागरिक रोजगारापासून वंचित राहू नयेत म्हणून मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामांना चालना देण्यात येत आहेत, अशी माहिती रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी दिली.   

ग्रामीण भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम परिसरात या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन कुणीही रोजगारापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व प्रशासनाने विविध कामांना तत्काळ प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्याची प्रक्रिया पार पडली. कामावर असलेल्या प्रत्येकाला 15 दिवसाच्या आत त्यांची मजुरी थेट बँक किंवा पोस्ट खात्यात जमा करण्यात येत आहे. मजुरांची उपस्थिती सातत्याने वाढत असून त्याप्रमाणे विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे, असेही श्री. लंके म्हणाले.

मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली आहेत. नागरिकांना कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता पडू नये. स्थलांतर थांबवणे आवश्यक आहे. मेळघाटात अधिकाधिक रोजगारनिर्मितीला प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते.  त्यानुसार आजमितीला चिखलदरा तालुक्यात सुमारे 40 हजार 145, तर धारणी तालुक्यात सुमारे 27 हजार 125 मजूर उपस्थिती आहे.  मनरेगाच्या माध्यमातून तीन हजारावर विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. या दृष्टीने इतरही ठिकाणी कामे राबविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, कामांवर मास्क, सॅनिटायझरचा वापर करून व सोशल डिस्टन्सिंग आदी दक्षता घेण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

थेट ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांवरील मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. प्रतिदिन 238 रुपये याप्रमाणे किमान मजूरी देण्यात येते. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

0000


--

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते दिव्यांग मानसकन्येचा हृद्य सत्कार



गृहमंत्र्यांच्या पुढाकाराने झाले होते 2004 मध्ये लग्न

 

अमरावती, दि. 28 : वझ्झर येथील दिव्यांग, बेवारस बाल गृहातील एका दिव्यांग भगिनीची जबाबदारी स्वीकारून तिचे लग्न गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने झाले. संसारात सुखी झालेल्या या आपल्या दिव्यांग मानस कन्येचा व जावयाचा हृद्य सत्कार गृह मंत्री यांनी आज अमरावतीत केला. या हृद्य सोहळ्यात उपस्थित सर्वजण यावेळी भारावून गेले होते. 

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य बेघर बेवारस दिव्यांग बालगृहात सुशीला ही मुलगी आजीवन पुनर्वसनासाठी दोन वर्षांची असल्यापासून दाखल आहे. ती पुण्याला रेल्वे स्थानकावर सापडली होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर बाबा पापळकर यांनी या बालिकेला वझ्झरच्या आश्रमात आणून दाखल केले व तिचा सांभाळ केला. ती शिक्षित होऊन २१ वर्षांची होताच शंकरबाबा पापळकर यांनी तिचा विवाह वलगाव येथील दिव्यचक्षू अशोक देशमुख यांच्याशी निश्चित केला.

गृह मंत्री अनिल देशमुख यांनी या विवाहासाठी पुढाकार घेतला व अमरावती येथे झालेल्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून आपली मानसकन्या व जावयाला आशीर्वाद दिला. दि. 30 जून 2004 रोजी हा विवाह संपन्न झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी कुंदन कौशिक व पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी त्यावेळी कन्यादानात सहभाग घेतला होता.

गृह मंत्री श्री. देशमुख हे आज बैठकीनिमित्त अमरावतीत आले असताना त्यांनी शंकरबाबा पापळकर यांच्याशी चर्चा करताना आपल्या मानसकन्येची व जावयाची चौकशी केली. त्यावर आपण उभयतांना प्रत्यक्ष भेट घेऊन आशीर्वाद देण्याची शंकर बाबांनी विनंती केली. त्यानुसार आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग सुशीला व अशोक देशमुख आले. गृह मंत्र्यांनी साडी चोळी व कपडे देऊन आपल्या जावयाचा व लेकीचा सन्मान केला व आशीर्वाद दिला. या संवेदनशील सोहळ्यात उपस्थित सगळेच भारावून गेले होते.

00000

 

Wednesday, May 27, 2020

जिल्ह्यातील कॉटन जीनची संख्या 25 वर कापूस खरेदीला वेग देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश


अमरावती, दि. 27 : कापूस खरेदीला वेग देण्यासाठी 8 खरेदी केंद्रांवरील जीनची संख्या 18 वरून 25 पर्यंत वाढली असून त्यासाठी राज्य कापूस पणन महासंघाला जिल्हा प्रशासनाकडून पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घेऊन कापूस खरेदी गतीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्या दूर करण्यासाठी व कापूस खरेदीला गती देण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन निर्देश दिले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासह चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार काही जीन सुरु झाल्यास खरेदीला गती मिळेल. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगण्यात आले. त्यात असे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली.

त्यानुसार जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 10 कृषी पर्यवेक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या. या सर्व पर्यवेक्षकांना ग्रेडिंगबाबत प्रशिक्षण देण्यात आले. पणन महासंघाला हे प्रशिक्षित मनुष्यबळ प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले. मागच्या आठवड्यापासून त्यांना फिल्डवर नेमण्यात आले आहे. त्यामुळे सात आणखी जीन सुरु होऊ शकल्या. पूर्वीची 18 जीनची संख्या आता 25 वर गेली आहे. त्यामुळे कापूस खरेदीला वेग येत आहे. आतापर्यंत 22 हजार 204 शेतक-यांची सुमारे सव्वासहा लाख क्विंटल कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी दिली.

        कापूस खरेदीसाठी दिवसभरात केंद्रावर येणा-या सर्व गाड्यांची खरेदी त्याच दिवशी पूर्ण व्हावी. गाड्यांची मर्यादा वाढवावी. वाढत्या तापमानामुळे आगी लागणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तयार गाठींच्या संकलनासाठी गोदामांची उपलब्धता वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कापूस खरेदी 15 जूनपूर्वी पूर्ण झाली पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न करावा. नियोजनानुसार खरेदी झाली पाहिजे. त्यादृष्टीने सीसीआय, पणन महासंघ यांनी प्रयत्न करावे.  कोरोना संकटकाळ लक्षात घेता अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. मात्र, त्याशिवाय ही कामे पूर्णत्वास जाऊ शकणार नाहीत, हे लक्षात ठेवून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात एकूण आठ कापूस खरेदी केंद्रे आहेत. त्यातील एक सीसीएचे असून, ते धामणगाव रेल्वे आहे. उर्वरित केंद्रे सात पणन महासंघाची आहेत. कापसाचा हमीभाव 5 हजार 500 रूपये आहे.  कापूस खरेदी प्रक्रियेत सोशल डिस्टन्स, मास्क आदी दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. मात्र, दक्षता पाळताना कामाच्या वेगही कायम ठेवावा लागेल. सर्वांची सुरक्षितता जपून प्रत्येक कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. कुठल्याही अडचणी आल्या तर  तत्काळ निदर्शनास आणून द्यावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांची गैरसोय होता कामा नये. त्यासाठी नियोजनपूर्वक कामे करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

                                                000

 


टोळधाड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून उपाययोजना जाहीर




किडीच्या नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करा

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे कृषि विभागाला निर्देश

अमरावती, दि. 26 : अमरावती जिल्ह्यामध्ये टोळधाड या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ही टोळधाड दूरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदीचा फडशा पाडते. या किडीचा प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जिल्ह्यातील वरुड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. यावर कृषि विभागाने क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तत्काळ उपाय करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले. काल दि. 26 मे, रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत वरुड तालुक्यातील काही गावांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पाहणी दौऱ्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते. टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्या यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, टोळधाड या किडीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जिल्ह्यात वरुड, मोर्शी व चांदूरबाजार तालुक्यात टोळधाडीच्या आक्रमणाने शेतकरी चिंतीत झाले आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पुढीलप्रमाणे कृषी विभागाकडून जाहिर केलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वरुड तालुक्यातील पाळा, उमरखेड, गव्हाणकुंड, हिवरखेड या गावांमधून टोळधाडीचा एक थवा स्थलांतरीत होतांना कृषी विभागाला आढळून आला आहे. कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी गावोगावी फिरुन शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अंतर्गत प्रामुख्याने टिनाचे डबे, ढोल वाजविणे, टॅक्टर व मोटर सायकलचा सायलेन्सर काढून शेतात मोठ्याने आवाज करुन किडीला हूसकावून लावावे. तसेच क्लोरोपायरीफॉस व मेल्यॉथिऑन या किटकनाशकाची फवारणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वरुड तालुक्यातील पुसला, खापरखेडा या शिवारात सायंकाळी या किडीचा थवा थांबलेला आढळल्याने त्यावर ट्रॅक्टर स्प्रेअर, अग्निशमन बंबच्या सहाय्याने कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली फवारणी करण्यात आली. यामुळे सदर किडीचा थवा कमी होऊन पुढे नागपूर जिल्ह्याच्या सिमेवर गेल्याचे समजले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टोळधाडचा थवा आढळून आल्यास किंवा थांबलेला दिसल्यास वरीलप्रमाणे उपायांनी थवा हाकलून लावल्यानंतर पुढच्या गावांतील लोकांना सतर्क राहून त्यांना सुध्दा याप्रमाणे उपाययोजना करण्याबाबत सांगावे. सायंकाळी सहा वाजल्यानंतर टोळधाड उंच झाडावर स्थिरावते, अशा स्थिरावलेल्या थव्यासाठी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना कळवून त्यांच्या देखरेखीखाली सामुहिक फवारणी अग्निशमन बंबाच्या सहाय्याने करावी. तसेच गावात ज्या  शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर स्प्रेअर, पॉवर स्प्रेअर, एचटीपी स्प्रेअर फवारणीचे विविध यंत्र उपलब्ध असल्यास त्यांनी फवारणीचे यंत्र सज्ज ठेवून फवारणीसाठी सहाय्य करावे.

ज्या शेतकऱ्याकडे भाजीपाला, फळपिक आहेत त्यांनी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या बेंडीओक 80 डब्लू. पी., क्लोरोपायरीफॉस 20 ईसी, 50 ईसी, डेल्टामॅथीन 2.8 युएलव्ही व 1.25 युएलव्ही, डायपलूबेंझुर 25 ईसी लॅम्ब्डा सायहॅलोथीन 25 ईसी व 10 डब्लू पी, मॅलॉथिऑन 50 ईसी व 25 ईसी व 95 युएलव्ही किटकनाशकांची, औषधाची फवारणी करण्याचे सुचविण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. परंतू सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

00000

Tuesday, May 26, 2020

खरीप कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पीक कर्जासाठी अनावश्यक कागदपत्रे मागू नका

-   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



        अमरावती, दि. 26 : बँकामधून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करू नये. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्यक कागदपत्रे मागून शेतकरी बांधवांची अडवणूक केल्यास कठोर कारवाई करू, असा सज्जड इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बँकांना दिला आहे.

            अमरावती जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2020-21 करिता किसान क्रेडीट कार्डअंतर्गत पीक कर्ज वाटप सुरु आहे. त्याकरिता बँका शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करीत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. कोरोना संकटामुळे कृषी क्षेत्र आधीच संकटात सापडले आहे. शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी शासन विविध कल्याणकारी निर्णय घेत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अद्यापही लाभ न मिळू शकलेल्या पात्र शेतकरी बांधवांना तो मिळवून देण्यासाठी कर्जाची रक्कम शासन व्याजासह भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी खरीपासाठी शेतक-यांना तत्काळ कर्ज मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीपासाठी कर्ज देण्याची कार्यवाही मुदतीत करावी. आवश्यक तीच कागदपत्रे घेऊन शेतकरी बांधवांना कर्ज मिळवून द्यावे. त्यासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करावे.  एकही शेतकरी बांधव पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकरी बांधवांची कुठेही अडवणूक होत असल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिला आहे.

            पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून पीक कर्जासाठी लागणा-या कागदपत्रांची यादी जाहीर  करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही यासंबंधी नुकतीच बँकांची बैठक घेऊन विविध निर्देश दिले. त्यानुसार किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत पिक कर्जाकरिता लागणाऱ्या आवश्यक दस्तऐवजांची विभागणी कर्जाच्या प्रकारावरून निश्चित करण्यात आली आहे. सर्व बँकांच्या सहमतीने हा निर्णय झाला आहे. किसान क्रेडीट कार्डअंतर्गत पीक कर्ज मंजूर करतांना शेतकरी बांधवांकडून अनावश्यक कागदपत्रे मागू नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.   

त्यानुसार पीक कर्ज नूतनीकरणासाठी आवश्यक दस्तऐवज आधार कार्ड, सात बारा उतारा व आठ-अ असा आहे. नवीन पीक कर्जाकरिता आधार कार्ड, सात बारा उतारा, आठ-अ, फेरफार, दोन फोटो, जमिनीचा नकाशा (तलाठी यांनी दिलेला हात नकाशा  किंवा तलाठी यांनी जमिनीच्या हद्दी नमूद करून दिलेलाही चालेल), एक लाख साठ हजार रू. च्या वर कर्ज घेतल्यास मॉर्गेज/ ई करार, कायदेशीर तपासणी अहवाल (लीगल सर्च रिपोर्ट- 1लाख60 हजार रूपयांवरील प्रकरणी), तसेच नो ड्युज करीता शंभर रूपये स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे.

            स्टॅम्पवर (१०० रु) लेटर ऑफ कंटिन्यूटी आणि प्रति एक लक्ष रूपयांसाठी १०० रूपयांचा बॉण्ड अथवा स्टॅम्प लागेल. सर्व बँकांनी याप्रमाणे नमूद कागदपत्रे पीक कर्ज मंजूर करतेवेळी शेतकऱ्यांकडून घेण्यात यावी. बँकांनी इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये. कोणत्याही बँकांनी असे केल्यास तसेच पीक कर्ज मंजुरीसाठी टाळाटाळ केल्यास शेतकरी बांधवांनी संबंधित तालुक्यातील तहसिलदार, सहाय्यक निबंधक व सहकारी संस्था कार्यालय येथे संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथील  टोल फ्री क्रमांक 1077 वर किंवा 0721-2662025 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

00000

        

शिवनगर, नागपुरी गेट स्‍वॅब सेंटर व शहरी आरोग्‍य केंद्र हैदरपुरा येथे जिल्‍हाधिकारी यांची भेट




 प्रशासन कोरोना योध्‍दांच्‍या पाठीशी

- जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल

         अमरावती दि.26 : शिवनगर या परिसरात रुग्‍ण आढळत आहे. सदर परिसराची सद्याची स्थितीची पाहण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे, नगरसेवक संजय वानरे यांनी पाहणी केली. शिवनगर परिसरात प्रशासनातर्फे करण्‍यात आलेल्‍या उपाययोजनांचा सदर स्‍थळी जावून आढावा घेतला. या परिसरातील नागरीकांची जिल्‍हाधिकारी महोदयांनी संवाद साधला की, नागरिकांनी मास्‍क चा वापर करावा, साबनाने वारंवार हात धुवावे तसेच सोशल डिस्‍टंसिंगचे पालन करावे. या परिसरातील नागरिकांना मास्‍क चे वाटप यावेळी त्‍यांनी केले. सदर परिसरातील काही रस्‍ते बॅरिकेट लावून बंद करण्‍याबाबत सुचना दिल्‍या. त्‍या अनुषंगाने सदर रस्‍त्‍यावर बॅरिकेट करण्‍यात आले.  यावेळी सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक धनंजय शिंदे उपस्थित होते.

        महानगरपालिका, अमरावती कार्यक्षेत्रातील कोविड-19 बाधीत रुग्‍णाचे सहवासित व संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तीचे स्‍वॅब सँम्‍पल मनपा शाळा, नागपुरी गेट येथील लॅबमध्‍ये घेण्‍यात येते त्‍या लॅब सेंटरची पाहणी जिल्‍हाधिकारी महोदयांनी केली. या ठिकाणी नागरिक स्‍वॅब द्यायला आले होते त्‍यांची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी परिचारीका सुशिला दामले, मीनल राऊत, वैशाली बुरनासे यांची विचारपुस करुन त्‍यांना स्‍वतःहाची काळजी घेण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. शासनानी दिलेल्‍या सुचनेचे पालन करावे तसेच आयुष मंत्रालयाने सुचित केलेल्‍या औषधीचा वापर करावा. आपल्‍याला या संकटकाळात काम करण्‍याची संधी मिळाली आहे. आपण खरोखर चांगले काम करत आहात. कोणत्‍याही प्रकारची भिती न बाळगता स्‍वतःहाची व संपुर्ण परिवाराची काळजी घेवून आपल्‍या दिलेले कार्य पुर्ण करा. यावेळी त्‍यांनी सर्व आरोग्‍य कर्मचा-यांना तसेच इतरही कर्मचा-यांना त्‍यांच्‍या कार्यासाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. विशाल काळे, सहाय्यक आयुक्‍त  तौसिफ काझी, डॉ. फिरोज खान, नुर खॉं उपस्थित होते.

        अमरावती महानगरपालिकेचे शहरी आरोग्‍य केंद्र हैदरपुरा येथे जिल्‍हाधिकारी महोदयांनी भेट दिली. या केंद्राची संपुर्ण माहिती डॉ.पुर्णिमा उघडे व परिचारीका अर्चना बावीस्‍कर यांनी दिली. या आरोग्‍य केंद्रा मार्फत माताबाल संगोपन व लसीकरणाचे नियमितपणे काम सुरु आहे. या केंद्रा अंतर्गत ताजनगर तसेच इतरही प्रतिबंधीत क्षेत्र येत असल्‍याने या केंद्राची जबाबदारी ही मोठी आहे. या केंद्रा अंतर्गत येणा-या संपुर्ण परिसराचे आतापर्यंत तिन वेळा सर्वेक्षण झाले असून नागरिक आता सहकार्य करत असल्‍याचे यावेळी माहिती देण्‍यात आली. जिल्‍हाधिकारी महोदयांनी सदर केंद्रावर येणा-या नागरिकांची माहिती जाणून घेतली. या केंद्रा अंतर्गत कोणता भाग येतो तसेच सदर भागात सद्याची स्थिती व त्‍यावर केलेल्‍या उपाययोजना याचा आढावा घेतला. या केंद्रावरील सर्व कर्मचा-यांची त्‍यांनी आपुलकीने विचारपुस केली. मागील अनेक दिवसापासुन या केंद्राचे निरंतर कामकाज सुरु असून येथील कर्मचा-यांच्‍या कामाचे कौतुक त्‍यांनी यावेळी केले.

00000


DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...