विशेष रेल्वेने बिहारचे बाराशे कामगार रवाना
अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या बिहारमधील 1 हजार 236 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष श्रमिक एक्प्रेस आज अमरावती रेल्वे स्थानकावरून बिहारमधील बरौनीकडे रवाना झाली.
अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडण्यासाठी ही विशेष श्रमिक एक्स्प्रेस विनाथांबा बरौनीपर्यंत जाणार आहे. ही एक्स्प्रेस 24 डब्यांची असून, त्यातून 1 हजार 236 प्रवासी नागरिक रवाना झाले. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
रेल्वेस्थानकावर प्रथमत: सर्व प्रवासी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांच्या भोजन, चहा, पाणी व इतर व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी नानकरोटी उपक्रमाचे सहकार्य मिळाले. विभागातून ठिकठिकाणाहून आलेल्या प्रवाश्यांच्या चेह-यावर घरी परतण्याचा आनंद दिसत होता.
संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून अडकून होतो. मात्र, शासनाने आमची दखल घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था केली. त्यामुळे आम्ही अनेक दिवसांनी घरी परत जाऊ शकत आहोत. आमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना अनेक दिवसांनी भेटता येणार आहे. घरी परतण्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली. महिला, बालके यांचाही समावेश प्रवाश्यांत होता.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होताच शासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या परतीचा मार्ग मोकळा केला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी इतर राज्यांचे सचिव, संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार नियोजन करण्यात आले असून, स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. भोजन व इतर व्यवस्थेसाठी विविध स्वयंसेवी संस्थांचेही या उपक्रमाला मोठे सहकार्य मिळत आहे.
जिल्ह्यात अडकलेल्या इतरही नागरिकांना स्वगृही पोहोचविण्यासाठी नियोजन केले असून, सर्वांनी संयम ठेवावा. कुणीही पायी जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केले आहे. लवकरच झारखंड येथील प्रवाश्यांना स्वगृही पोहोचविण्यासाठी विशेष ट्रेन सोडण्यात येणार असून, त्याचे नियोजन होत आहे.
000
Comments
Post a Comment