Saturday, September 30, 2023

आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प सप्ताहाचा शुभारंभ धारणी येथील आदिवासी क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती

 





आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमांतर्गत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकल्प सप्ताहाचा शुभारंभ

धारणी येथील आदिवासी क्षेत्रातील नागरिकांची कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती


      अमरावती, दि. 30 (जिमाका): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संकल्प सप्ताहाचा शुभारंभ भारत मंडपम, नवी दिल्ली येथे आज करण्यात आला. या कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील आदिवासी बांधव तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दूरदृष्य प्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा हे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष नवी दिल्ली येथे उपस्थित होते. तर अमरावती येथून निती आयोगाचे आर. श्रवण, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी रिचर्ड यान्थन, परिविक्षाधीन अधिकारी नरेश आकनुरी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अरुण रणवीर, सहायक सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र फुलझेले, अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे, धारणीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब रायबोले आदी मान्यवर यावेळी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज भारत मंडप, नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताह कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. जम्मू काश्मीर , उत्तर प्रदेश तसेच मेघालय येथील नागरिकांशी पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी तालुक्यातील नागरिकांनी आभासी पध्दतीने या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी सहभागी होणारे सर्व आदिवासी पुरुष, महिला व बालकांनी पारंपारिक वेशभूषा धारण केली होती. सामुदायिक आरोग्य अधिकारी, धारणी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता यावेळी उपस्थित होत्या.

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यावेळी ‘सबकी आकांक्षा, सबका विकास’ याचे महत्त्व विषद केले. प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावरुन देशाच्या विकासासाठी योगदान द्यावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहचविण्यासाठी आकांक्षित ब्लॉक कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. ‘संकल्प ते सिध्दी’ हा मार्ग अनुसरुन समाजातील गरजू घटकांना मदत पोहचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून सामाजिक आणि आर्थिक मागास तालुक्यांच्या शाश्वत विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरु करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

देशात 500 आकांक्षित ब्लॉक तयार झाले आहेत. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका निभावेल. यामध्ये कृषी, आरोग्य, शिक्षण, अर्थ व सामाजिक कार्य मूलभूत पायाभूत सुविधा यांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. देशातील दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आकांक्षित ब्लॉक कार्यक्रमाच्या माध्यमातून विकास पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. समाजाच्या विकासासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. कोणत्याही योजनेच्या यशस्वीतेसाठी जनसहभाग खुप महत्त्वपूर्ण असतो. शासन आणि जनसहभागाच्या सहकार्याने येत्या वर्षभरात आश्वासित ब्लॉकच्या माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा मानस पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. 

देशातील 329 जिल्ह्यांमध्ये 500 आकांक्षित ब्लॉकमध्ये हा कार्यक्रम लागू केला आहे. संकल्प सप्ताह हा 500 आकांक्षित ब्लॉकमध्ये आयोजित केला जाईल. या सप्ताहाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होऊन 9 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट विकास थीम घेऊन आयोजित करण्यात येईल. 

*

Thursday, September 28, 2023

अभय योजनेला 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ; पाणीपट्टी थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा

 अभय योजनेला 31 ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ;

पाणीपट्टी थकबाकीदार ग्राहकांनी लाभ घ्यावा

              अमरावती, दि. 28 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत भाग घेणाऱ्या ग्राहकांनी मुद्यलाची पुर्ण रक्कम भरल्यास थकबाकीवरील विलंब आकारामध्ये 100 टक्के पर्यंत व्याज माफीची सवलत देण्यात येते. या योजनेला आता दि. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलव्यवस्थापन विभाग, अमरावती कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी केले आहे.

            महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांसाठी पाणी पट्टीच्या मुळ मुद्यलावरील विलंब आकार माफीच्या सवलतीची अभय योजना 1 फेब्रुवारी 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत जाहिर झाली होती. आता या योजनेस माहे एप्रिल 2023 ते ऑक्टोंबर 2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यास शासनमार्फत मान्यता मिळाली आहे. म.जी. प्रा. चे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी  याबाबत परिपत्रक काढले असून वसुलीचे उद्यिष्टे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

            पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज होणारा खर्च व प्रत्यक्ष उत्पन्न यामध्ये फार मोठी तफावत असल्यामुळे मजीप्रामार्फत वसुली मोहिम राबविण्यात येत आहेत. अमरावती व बडनेरा शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी दरमहा 160 लक्ष रूपये इलेक्ट्रीक बिलाचा खर्च येत असुन देय तारखेत बिलाचा भरणा न केल्यास 3.10 लक्ष रूपयांचा दंड मजीप्राला अकारण भरावा लागतो. एकीकडे नियमितपणे पाणी पट्टीचा भरणा करणारे ग्राहक तर दुसरीकडे वर्षानुवर्ष टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांमुळे मजीप्राच्या उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम होत आहे. पाणी पट्टी थकबाकी व विविध देणींच्या दायित्त्वाचे आर्थिक ओझे असल्यामुळे सद्य:स्थितीत पाणी बिलांच्या थकबाकीसाठी पाणी पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे थकीत पाणी पट्टी ग्राहकांनी आपले कर्तव्य समजुन व्याज माफीच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा व नियमित बिलाचा भरणा करावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

00000

खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी मोहिम

 खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध

प्रशासनामार्फत तपासणी मोहिम

          अमरावती, दि. 28 : सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, मावा, नमकीन या अन्न पदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनांची बाजारात विक्री होण्याची शक्यता लक्षण अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी तपासणीची मोहिम सुरु असल्याची माहिती सह आयुक्त गणेश परळीकर यांनी दिली आहे

अमरावती शहर व जिल्ह्यातील मिठाई, खवा-मावा, खाद्यतेल, वनस्पती, घी व सणासुदीचे अन्नपदार्थ उत्पादक, रिपॅकर व घाऊक विक्रेते यांचे तपासणीची विशेष मोहिम खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राबवली जात आहे. ग्राहकांना सुरक्षित व सकस अन्न पदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी संशयित पदार्थांचे नमुने घेतले जात आहेत. ऑगस्ट 2022 पासून मोहिमे अंतर्गत अमरावती जिल्ह्यात मिठाई व नमकीनचे 5, खाद्यतेल व वनस्पतीचे 4, दुध व दुग्धजन्य पदार्थांचे 19 व आटा, रवा, बेसन, मैदा इत्यादी या अन्न पदार्थांचे 13 असे एकूण 41 नमुने विश्र्लेषणासाठी घेतले असून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल. तसेच सणासुदीच्या काळात अन्न भेसळ व कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्याविरूध्द कडक कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त शदर कोलते यांनी दिला आहे.

खाद्यपदार्थबाबत अशी घ्या काळजी

      ग्राहकांनी अन्नपदार्थ परवानाधारक किंवा नोंदणीधारक दुकाने, व्यापाराकडूनच खरेदी करावेत. मिळाई, दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावेत व ते त्वरीत किंवा सुचनेनुसार तासाचा आता सेवन करावते. अन्न पदार्थ साठवणुक करतांना आवश्यकतेनुसार त विशिष्ट तापमानात फ्रिज मध्ये ठेवावेत. अन्न पदार्थ खरेदी करतांना यूज बाय डेट तपासून घ्यावी. उघड्या वरील अन्नपदार्थ खरेदी करून नयेत. भेसळीबाबत खात्री आल्यास त्वरीत अन्न प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित

 महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित

अमरावती, दि. 28 : महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणाकरीता टॅब देण्याची योजना राबविण्यात येते.  या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांना शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे वितरण करण्यात येणार होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे टॅब वितरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असुन टॅब वाटपाबाबतची तारीख महाज्योती मार्फत संदेशव्दारे पाठविण्यात येईल. तरी संबधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

000000

6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत ‘माहिती अधिकार सप्ताह’; जनजागृतीपर उपक्रम राबवा; राज्य माहिती आयोगाचे आवाहन

 6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत ‘माहिती अधिकार सप्ताह’; जनजागृतीपर उपक्रम राबवा; राज्य माहिती आयोगाचे आवाहन

            अमरावती, दि. 28: माहितीचा अधिकारी अधिनियमाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी दि. 6 ते 12 ऑक्टोंबर कालावधीत माहिती अधिकार सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये माहिती अधिकारी कायद्याबाबत सर्व शासकीय कार्यालयाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून  जनजागृती मोहिम राबवावी, असे आवाहन राज्य माहिती आयोगाचे उपसचिव देविसिंग डाबेराव यांनी केले आहे.

            सप्ताहामध्ये माहिती अधिकारी कायद्याबाबत जनमानसात व्यापक जाणीव जागृती व्हावी यासाठी प्रशासनाव्दारे विविध उपक्रम राबविण्यात यावे. यामध्ये शासकीय, निमशासकीय तसेच शाळा महाविद्यालय, विद्यापीठ व शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारित पथनाट्य, प्रश्नमंजुषा, निबंधस्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. माहितीचा अधिकारी अधिनियम, 2005 चे कलम 4अंतर्गत प्रत्येक कार्यालयाने जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची नावे व पदनाम दर्शविणारे फलक लावणे, 17 मुद्यांची माहिती प्रसिद्ध करणे, अर्जाचे तातडीने निपटारा करणे व शास्तीचे प्रकरणे तातडीने हाताळून अनुपालन अहवाल आयोगाकडे पाठविणे इत्यादी कामे तातडीने मार्गी लावावे. माहिती अधिकार अधिनियमांच्या तरतुदींची माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळेल यादृष्टीने प्रत्येक कार्यालयाने जनजागृती करावी, असेही आवाहन राज्य माहिती आयोगाव्दारे करण्यात आले आहे.

000000


पंतप्रधान साधणार जिल्हा प्रशासनाशी संवाद; पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 पंतप्रधान साधणार जिल्हा प्रशासनाशी संवाद;

पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

 

          अमरावती, दि. 28: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शनिवार दि. 30 सप्टेंबर रोजी धारणी तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधणार आहे. हा संवाद कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे.  त्याअनुषंगाने आज कार्यक्रमाची पूर्वतयारी संदर्भात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज आढावा बैठक  घेतली. यावेळी कार्यक्रमाची व्यवस्था सुयोग्य पार पाडण्यासाठी संबधित विभाग प्रमुखांकडे जबाबदारी सोपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिले.

            केंद्र सरकारकडून सामाजिक आणि आर्थिक मागास तालुक्यांच्या शाश्वत विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणीचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून येथील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. पंतप्रधानांसोबत दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधणार  असल्याने इंटरनेट सेवा अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश बीएसएनएलला यावेळी देण्यात आले आहेत. पंतप्रधानांशी होणारा संवाद सुरळीत व्हावा, या दृष्टीने संबधित विभाग प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी धारणी येथील नागरिकांची निवड करणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारे अधिकारी व अन्य लोकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था पुरविण्याचे निर्देश पोलिस यंत्रणेला देण्यात आले आहेत. याअनुषंगाने नीती आयोगाची चमू दाखल होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने त्यांच्या आकांक्षित तालुक्याच्या आराखडा नीती आयोगाला सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रंगीत तालीम घेण्यात येत असून प्रत्येक विभागाने पूर्णतयारीने उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले.

0000

Wednesday, September 27, 2023

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी); मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती

 विशेष लेख :

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी);

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), अमरावती मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. या संदर्भात माहिती करुन देणारा लेख.

            महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून 25 जून 2018 रोजी कंपनी अधिनियम 2013 चे कलम 8 अन्वये सारथी संस्थेचे स्थापना करण्यात आली तसेच नोंदणी कंपनी कायद्यान्वये नोंदणी करण्यात आली आहे. सारथी संस्थचे मुख्य कार्यालय पुणे येथे तर उपकेंद्र कोल्हापूर येथे आहे. तसेच खारघर(नवी मुंबई), पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर येथे विभागीय कार्यालय आहेत. सारथी संस्था मुख्यत: मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली कामकाज करते.

केंद्रीय लोकसेवा आयोग

सारथीमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षणातून सन 2020 ते 2022 दरम्यान 51 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली आहेत. यामध्ये 12 जण आयएएस, 18 जण आयपीएस, 6 जण आयआरएस, 2 जण आयएफएस तर इतर सेवेला 13 जणांची अंतिम यादीत निवड झाली आहेत. 

            या उपक्रमांतर्गत सारथी मार्फत युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही टप्प्यावर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रूपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. तसेच  प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते. युपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना युपीएससी मुख्य परीक्षेच्या तयारीकरिता एकवेळ एकरक्कमी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. तर युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी एकवेळ एकरक्कमी 25 हजार आर्थिक सहाय्य दिले जाते.

 

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले जात प्रमाणपत्र (मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी), शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबधित तहसिलदार अथवा सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक राहील.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा परीक्षाप्रमाणेच राज्यसेवा परीक्षामध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एमपीएससीसाठी 750 विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रूपये एक रक्कमी  अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. तसेच मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 10 हजार रूपये एकरकमी दिले जातात.

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले जात प्रमाणपत्र (मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी), शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबधित तहसिलदार अथवा सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक राहिल.

           

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF)

 

या योजनेंतर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतु कमाल 5 वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे जेआरईसाठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 31 हजार रूपये अधिछात्रवृती व एसआरईसाठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 35 हजार रूपये अधिछात्रवृती देण्यात येते. तसेच युजीसी नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो. सन 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांना फेलोशिपसाठी एकूण 42 कोटी 33 लाख 36 हजार, घरभाडे भत्त्यासाठी 2 कोटी 36 लाख 50 हजार व आकस्मिक खर्चासाठी 40 लाख 7 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील सन 2019 ते 2022 पर्यंत एकूण 30 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

 

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले जात प्रमाणपत्र (मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी), शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबधित तहसिलदार अथवा सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक राहिल. अर्ज करणऱ्या उमेदवाराकडे एम.फील किंवा संशोधनाकरिता कायम नोंदणी असणे आवश्यक राहील.

 

-           सतिश आनंदराव बगमारे,

माहिती सहायक/उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

00000

ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी

 ईद ए मिलादनिमित्त शुक्रवारी सुट्टी

अमरावती, दि. 27 : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी(दि.28) होणार आहे. या कालावधीत गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून ईद ए मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार दि. 28 ऐवजी शुक्रवार दि. 29 रोजी शासकीय सुट्टी जाहीर झाल्याचे आदेश सामान्य प्रशासनाकडून निर्गमित झाले आहे.

            अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून दि. 28 सप्टेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालय नियमित सुरु राहतील.

00000

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

 महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

अमरावती, दि. 27 : महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटी च्या प्रशिक्षणासाठी टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांनी कागदपत्रासह शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणाकरीता टॅबलेट देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक सत्र करीता अमरावती जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या 394 विद्यार्थ्यांना टॅबलेट मंजूर झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना टँब मंजुर झाल्याबाबतच्या संदेश महाज्योतीकडून प्राप्त झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे उपस्थित राहावे.

000000

ईद-ए-मिलाद उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

 ईद-ए-मिलाद उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

            अमरावती, दि. 27 : अमरावती शहरात  28 सप्टेंबर रोजी (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मुस्लीम बांधवाचे ईद-ए-मिलाद  निमित्त मिरवणुक काढण्यात येतात. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे :

वाहतुकीचा पर्यायी मार्ग

            ट्रांसपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची एकतर्फा वाहतुक सुरू राहील. चित्रा चौक ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दिपक चौक मार्गे वळविण्यात येईल. हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकाराचा जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक महाजनपुरा मार्गे वळविण्यात येईल.

 

जवाहर गेट ते टांगा पडाव या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक सराफा- गांधी चौक- जयस्तंभ मार्गे वळविण्यात येईल. लालखडी ते पठाण चौक या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक लालखडी रिंगरोड मार्गे वळविण्यात येईल.

 

वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्या व महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत करवाई करण्यात येईल. हा आदेश दि. 28 सप्टेंबरच्या (एक दिवस मागे-पुढे चंद्र दर्शनानुसार) मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील  यांनी केले आहे.

00000

गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

 गणेशोत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

            अमरावती, दि. 27 : अमरावती शहरातील न्यु आझाद गणेश मंडळाचे गणपती विसर्जन मिरवणुक दि.  5 ऑक्टोबर  रोजी खापर्डे बगीचा येथून शहरातील विविध भागातून जाणार आहे. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. ते याप्रमाणे :

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

न्यु गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणुक खापर्डे बगीचा येथून सुरू होवून मिरवणुक इर्विन चौकात आल्यानंतर गर्ल्स हायस्कुल चौकाकडून इर्विन चौका कडे येणारी वाहतुक पोलीस पेट्रोल पंप मार्गे बस स्टँड कडून व बाबा कॉर्नर कडून इर्विन चौकाकडे येणारी वाहतुक लेखुमल चौकाकडे वळविण्यात येईल. विसर्जन मिरवणुक मर्च्यूरी टी पॉइंट ते रेल्वे स्टेशन मार्गाने असतांना रेल्वे स्टेशन चौकाकडून येणारे व मर्च्यूरी टी पॉइंट कडून रेल्वे स्टेशन कडे जाणारी वाहतुक एकतर्फी मार्गाने सुरू राहील. मिरवणुक रेल्वे स्टेशन चौक ते रेल्वे ब्रिजवर आल्यानंतर एस टी स्टँड कडून येणारी वाहतुक उस्मानिया मस्जिद ते खापर्डे बगीचा मार्गाने वळविण्यात येत आहे. तसेच रूख्मीणी नगर कडून हमालपुरा रोडने रेल्वे ब्रिजवर येणारी वाहतुक श्याम नगर चौक ते पोलीस पेट्रोल पंप मार्गाने वळविण्यात येईल.

 

मिरवणुक रेल्वे ब्रिज ते राजकमल चौक  मार्गावर असतांना एसटी स्टँड कडून येणारी वाहतुक रेल्वे स्टेशन कडून मर्च्युरी टी पॉइंट उड्डानपुल व मालवीय चौक, चित्रा चौक या मार्गाने वळविण्यात येईल. तसेच राजकमल चौकाकडून रेल्वे ब्रिजवर येणारी वाहतुक जयस्तंभ चौक, मालवीय चौक मार्गाने वळविण्यात येईल. मिरवणुक राजकमल चौक ते श्याम चौक मार्ग जयस्तंभ चौक मार्गावर असतांना गद्रे चौकाकडून येणारी वाहतुक उड्डानपुल राजापेठ किंवा गांधी चौक जवाहर गेट मार्गाने वळविण्यात येईल. तसेच हमालपूरा कडून येणारी वाहतुक रेल्वे स्टेशन चौक, मर्च्युरी टी पॉइंट मार्गाने वळविण्यात येईल. सदर मिरवणुक जयस्तंभ चौक-दिपक चौक मार्गावर असतांना राजकमल चौकाकडून येणार व जाणार वाहतुक सरोज चौक मार्गे-चित्रा चौक मार्गे जाईल. तसेच चित्रा चौका कडून येणारी वाहतुक दिपक चौक मार्गाने जयस्तंभ चौक किंवा दिपक चौकाकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर करतील.  मिरवणुक दिपक चौक ते मोसीकॉल जिन मार्गावर असतांना विलास नगर कडून येणारी वाहतुक ही लेखुमल चौक, बाबा कॉर्नर मार्गाने वळविण्यात येईल. तसेच दिपक चौक कडून विलासनगर कडे जाणारी वाहतुक इर्विन चौक मार्गे वळविण्यात येईल.

 

 वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. हा आदेश दि. 5 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील  यांनी केले आहे.

00000


महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि.30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

           अमरावती दि. 27 :  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास शनिवार दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.

 सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.

           माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2022-23 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी  तसेच सन 2021-22 साठी रि-अप्लाय करण्यासाठी  दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  ऑनलाईन नुतनीकरणाचे  अर्ज  विहित मुदतीत  भरण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in  महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या  लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी सेंड बँक केलेल्या अर्जाची संबंधित महाविद्यालयानी त्वरीत त्रुटिपूर्तता  करुन जिल्हा लॉगीन वर पाठविण्यात यावे. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील.

महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंड बॅक केलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाव्दारे करण्यात आले आहे.

00000

जिल्हा लोकशाही दिन 3 ऑक्टोंबरला

 जिल्हा लोकशाही दिन 3 ऑक्टोंबरला

            अमरावती, दि. 27 : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, मंगळवार, दिनांक 3 ऑक्‍टोबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

 

00000

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना व्यावसायिकांच्या प्रगतीला महामंडळाचे सहाय्य

 

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना

व्यावसायिकांच्या प्रगतीला महामंडळाचे सहाय्य

मराठा समाजातील व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सहाय्य केले जाते. आजवर महामंडळाच्या सहाय्यातून अनेक व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायामध्ये प्रगती करुन इतरांच्याही हाताला काम उपलब्ध करुन देत आहे. 

महामंडळामार्फत विविध व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. यात नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजाचा परतावा दिला जातो. महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपध्दती ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. ही योजना लाभार्थीभिमुख असून लाभार्थी जोपर्यंत आवश्यक सर्व माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या वेब प्रणालीवर अपलोड करीत नाही, तोपर्यंत पुढील कार्यवाही करता येत नाही.

महामंडळाच्या योजनासाठी सामाईक अटी व शर्ती

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. ही योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गासाठी तथा ज्या प्रवर्गासाठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्त्वात नाही, अशांसाठी आहे. योजनेसाठी वयोमर्यादेची अट पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी कमाल 60 वर्षे एवढी आहे. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयाच्या आत असावे. लाभार्थ्याने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक किंवा कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. या योजनेंतर्गत फक्त व्यवसायासाठी घेतलेल्या मुदत कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल. दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) मध्ये वयोमर्यादेच्या अटींचे बंधन नसेल. 

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट व संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनेंतर्गत फक्त व्यवसाय किंवा उद्योगासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल. व या योजनांची अंमलबजावणी शासनाच्या नियमाप्रमाणे करण्यात येईल. 

महामंडळाच्या योजनांची माहिती

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)

या योजनेंतर्गत राज्यातील कोणत्याही बँकेमार्फत 15 लक्ष रुपये मर्यादेत कोणताही व्यवसाय किंवा उद्योगासाठी लाभार्थ्यांनी कर्ज घेतल्यास त्या कर्जावरील व्याज परतावा जास्तीत-जास्त सात वर्षाच्या मर्यादेत व 12 टक्क्याच्या कर्ज दर मर्यादेत अथवा 4.5 लक्ष रकमेच्या मर्यादेत करण्यात येईल. 

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

या योजनेंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लक्ष रुपयाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लक्ष रुपयाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लक्ष रुपयांच्या मर्यादेवर व पाच व पाचपेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लक्ष रुपयापर्यंतच्या व्यवसाय व उद्योग कर्जावर 7 वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत-जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लक्ष रुपयांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये एफपीओ गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेमार्फत घेलेल्या कर्जावरील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल. 


                                   योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपध्दती

पात्रता प्रमाणपत्रासाठी महत्त्वाची कागदपत्रे

अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह आधार कार्ड, रहिवासी दाखला, वीज बिल, रेशन कार्ड, गॅस बिल, बँक पास बुक, उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल (याचा नमुना वेब प्रणालीवर उपलब्ध आहे.)

पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतरच एलओआय समवेत लाभार्थ्याने त्याला करावयाचा असलेला व्यवसाय, उद्योगाचा प्रकल्प अहवाल आवश्यक ते सर्व कागदपत्र घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पूर्ण प्रक्रिया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते. त्यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर अपलोड करावी. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा पाहिजे आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजूरी पत्र, बँकेमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक इएमआय वेळापत्रकावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य आहे. प्रकल्प अहवाल, हप्ता भरल्याबाबतचा पुरावा, बँक स्टेटमेंट सही व शिक्का असणे आवश्यक आहे.

त्यानंतर बँकेमध्ये पूर्ण इएमआय हप्ता विहित कालमर्यादेत भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. दाखल केलेला क्लेम अचूक असला तरच संबंधिताला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हप्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट सही व शिक्क्यानिशी अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थ्याने दाखल केलेल्या दाव्याची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यास अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरित करण्यात येईल. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांना संपर्क क्रमांक वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9730862870 हा आहे. इच्छुकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.

व्यावसायिक लाभार्थ्याचे मनोगत

मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा मनापासून आभारी आहे. कारण मागील वर्षी माझ्या महालक्ष्मी सुपर शॉपी या व्यवसायासाठी बँक ऑफ बडोदा, अमरावती या बँकेकडून 10 लक्ष रुपये कर्ज घेतले. त्या कर्जावरील व्याज मला अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून दर महिन्याला परत मिळत आहे. सुरुवातीला महामंडळाविषयी संपूर्ण माहिती नसल्यामुळे मनामध्ये थोडी धास्ती होती. परंतु व्यवसाय करायचाच असल्यामुळे मी महामंडळाच्या अमरावती जिल्हा कार्यालय येथे जिल्हा समन्वयक रोहित मोंढे यांची भेट घेऊन योजनेची सविस्तर माहिती घेतली. आणि त्यानंतर महामंडळाकडे रीतसर ऑनलाईन अर्ज करुन पात्रता प्रमाणपत्र (LOI) मिळवून घेतले. त्यानंतर कर्जासाठी बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करुन कर्ज मंजूर करुन घेतले. आता दर महिन्याला मी माझा हप्ता भरल्यानंतर हप्ता भरल्याचे बँक स्टेटमेंट महामंडळाच्या संकेतस्थळावर अपलोड करतो. त्यानंतर त्या हप्त्यातील व्याज हे मला महामंडळाकडून परत मिळत आहे. आज मी व्यासायिक म्हणून प्रगती केली आहेच शिवाय इतर बेरोजगार युवकांच्या हातालाही रोजगार उपलब्ध करुन देऊ शकतो, याचे मला समाधान आहे. 

- निलेश अवचार, अमरावती.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हानिहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणताही खाजगी व्यक्ती अथवा संस्थेच्या अमीषाला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा समन्वयक श्री. मोंढे यांनी केले आहे.

 

अपर्णा यावलकर

प्र. जिल्हा माहिती अधिकारी,

अमरावती.

*****

सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार

 सेवा महिना अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार

 

अमरावती, दि. 27 (जिमाका): सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत पूर्ण व्हावी आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी राज्यात 17 सप्टेंबरपासून ‘सेवा महिना’ राबविण्याला सुरुवात झाली असून तो 16 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.

सेवा महिना’ अंतर्गत विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना माहिती प्राप्त करून देणे, नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, यासाठी महिनाभर सेवा महिना हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), विभागाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येत आहे.

यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

*****

Tuesday, September 26, 2023

निवडणूक विभाग;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे शिबीराचे आयोजन

                                        निवडणूक विभाग;जिल्हाधिकारी कार्यालयाच्या

नियोजन भवन येथे शिबीराचे आयोजन

 

              अमरावती, दि. 26:  शासनाव्दारे दि. 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत सेवा महिना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने निवडणूक विभागाव्दारे आज(दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे विशेष शिबिरोच आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये मतदार नोंदणी, आधारकार्ड, पॅन कार्ड दुरुस्ती अशा विविध सेवांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. तरी नवमतदार व पात्र लाभार्थ्यांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

00000


10 ऑक्टोंबरपर्यंत कलम 144 लागू

 10 ऑक्टोंबरपर्यंत कलम 144 लागू

 

               अमरावती, दि. 26:  जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. आगामी काळात 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन तसेच ईद ए मिलाद मुस्लीम धर्मियांचा उत्सव आहे. या कालावधीत मिरवणुका, विविध धार्मीक व साजाजिक कार्यक्रम, आंदोलने दरम्यान सामाजिक माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने काही ठिकाणी वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये व जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, यासाठी 10 ऑक्टोंबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.  

0000

अटल अर्थसहाय्य योजना; अशासकीय सदस्यांच्या नेमणूकीसाठी अर्ज मागविले

 अटल अर्थसहाय्य योजना; अशासकीय सदस्यांच्या नेमणूकीसाठी अर्ज मागविले

 

            अमरावती, दि. 26: सहकार व वस्त्रोद्योग विभागाव्दारे सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेची अमंलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समितीसाठी नवीन अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक पात्र व्यक्तीनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एस. एस. कुंभार यांनी केले आहे.

 

            राज्यस्तरीय समितीच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय समितीसाठी नवीन अशासकीय सदस्याची नियुक्ती करायची आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय व अर्धशासकीय आस्थापनावर, संस्थावर कामकाजाचा अनुभव असणाऱ्या सेवानिवृत्त व विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी सहकारी कार्यालयाकडे अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अशासकीय सदस्यपदी नियुक्तीसाठी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार संकुल पहिला माळा, कांतानगर, अमरावती येथे संपर्क साधावा.

0000

अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा

 अंमली पदार्थांच्या वापराला प्रतिबंधासाठी सर्व विभागांने पुढाकार घ्यावा;समितीच्या बैठकीत चर्चा

 

               अमरावती, दि. 26 : अंमली पदार्थ वापराच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे. अंमली पदार्थांची विक्री जास्त होणाऱ्या परिसरात संबधित विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. व्यसनमुक्ती केंद्राशी समन्वय ठेवून या सामाजिक प्रश्नाला आळा घालण्यासाठी  सर्व विभागांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनी केले.

 

            अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस आयुक्तालयाकडून जिल्हास्तरीय अंमली  पदार्थ विरोधी कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलिस आयुक्तालयात आज बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसिलदार प्रशांत पडघन, टपाल विभागाचे सहायक अधिक्षक अतुल काळे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद गभणे, कृषी उपसंचालक विभागाचे उज्ज्वल आगरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.स्वाती सोनोने, अन्न व औषध प्रशासनाचे वैभव सुपसांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

             अंमली पदार्थांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम,  टपालाच्या माध्यमातून अंमली पदार्थांची मागणी व पुरवठा होणार नाही तसेच जिल्ह्यात खसखस किंवा गांजा पिकाची अवैध लागवड होणार नाही याची दक्षता घेणे, व्यसनमुक्ती केंद्रांशी समन्वय राखणे, दाखल झालेल्या व्यक्तींना कोणत्या अंमली पदार्थांचे व्यसन आहे याबाबतची माहिती, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती अभियान राबवणे,  पोलीस, अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  व राज्य उत्पादन शुल्क यांनी केलेल्या कारवायांच्या माहितीचा डेटाबेस तयार करणे, अंमली पदार्थांविरुध्द गुन्हे व करावयाची कार्यवाहीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

 

          औषध विक्रेत्यांकडून अनेकदा प्रिस्किप्शनशिवाय औषधे दिली जातात. बंदी घातलेल्या औषधांतील काही ठराविक घटक असलेली वेगळी औषधेही निरनिराळ्या नावाखाली उपलब्ध असतात. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय औषधांची विक्री होता कामा नये. याबाबत मेडिकल स्टोअर्सची नियमित तपासणी करावी. टपाल विभागाने पार्सल प्राप्त करणाऱ्याची चौकशी करुन व त्या पार्सलमध्ये काय आहे याची तपासणी करुनच संबंधित व्यक्तीला पार्सल सुपूर्द करावे. बंद पडलेल्या कारखान्यांत अनेकदा रात्रीच्या वेळी अवैध उत्पादन निर्मितीचे प्रकार पूर्वी घडले आहेत. तसे घडू नये, यासाठी वेळोवेळी तपासण्या करण्याचे निर्देश श्री. आठवले यांनी  यावेळी दिले.

 

00000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

                                                     शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

 अमरावती, दि. 26 :  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

             सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो 8 ऑक्टोंबर  2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध; 29 सप्टेंबरपर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

                          मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध;

29 सप्टेंबरपर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदारयादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत पूनरिक्षण पूर्व उपक्रमाचा एक भाग म्हणून दि. 29 सप्टेंबरपर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणासाठी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत दि. 29 सप्टेंबर 2023 पर्यत हरकती, आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या एकूण 2657 यादी भागांमध्ये राबविण्यात येत आहे.  कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुर्व पुनरिक्षण उपक्रमाचा एक भाग म्हणुन दि. 29 मे 2023 रोजीच्या भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 पर्यंत मतदारांची पडताळणी करण्यासाठी सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत गृह भेटीचा उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व पुर्नरचना देखील करण्यात येत आहे.

 अमरावती जिल्ह्यातील एकुण 8 विधानसभा मतदार संघामध्ये मिळुन एकत्रितरित्या मतदान केंद्राच्या नावातील बदलाचे एकुण 9 मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे एकुण 59 मर्ज करण्यात आलेले 8 मतदान केंद्र व भारत निवडणुक आयोगाकडील निर्देशानुसार 2 कि.मी.चे वर अंतर असल्याने व नैसर्गिक अडथळ्यामुळे नव्याने प्रस्तावित मतदार केंद्राची संख्या 7 आहे असे एकुण 83 मतदान केंद्राच्या सुसुत्रीकरण व पुर्नरचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहे. प्रस्तावित बदल हे सर्व विधानसभा मतदार संघाचा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयास मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत भारत निवडणुक आयोग यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्याकरीता प्राप्त झालेले आहेत. प्रस्तावित बदल व अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. याबाबत कोणत्याही मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांना सुचना द्यावयाची असल्यास या कार्यालयात सूचना देऊ शकतात.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि. 17 ऑक्टोंबर 2023 रोजी एकत्रित रित्या प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. नमुद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणुक आयोगाकडुन मंजूर झाल्यास एकत्रित रित्या प्रसिध्द होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमध्ये सदरचे बदल अंमलात येतील व त्या आधारे मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व पुर्नरचना देखील अस्तित्वात येईल.  प्रस्तावाबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची काही हरकत असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास नोंदविण्यात यावी.

000000

मेरी माटी मेरा देश; अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्य भातकुली नगर पंचायत येथे प्रभात फेरी: मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

                        मेरी माटी मेरा देश; अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्य

भातकुली नगर पंचायत येथे प्रभात फेरी: मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी

 

               अमरावती, दि. 26 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या अनुषंगाने, मेरी माटी मेरा देश  अभियान अंतर्गत भातकुली येथील नगर पंचायत येथे अमृत कलश यात्रा व स्वच्छता पंधरवाडा निमित्त आज जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. या प्रभात फेरीला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. यावेळी नगरपंचायातीचे नगराध्यक्षा योगिता राजु कोलेटके तसेच नगरपंचायत सभापती, उपसभापती, नगरसेवक आदी उपस्थित होते.

 

कलश यात्रा व प्रभात फेरीची सुरुवात शहरातील आठवडी बाजार येथून नगरपंचायत वाचनालय मार्गे जात असताना शहरात ठिकठिकाणी अमृत कलश यात्रेचे पूजन करून वाजत गाजत स्वागत करण्यात आले. अमृत कलश यात्रेचा समारोप महर्षी वाल्मिकी चौक येथे करण्यात आला. कलश यात्रेमध्ये मुख्याधिकारी रविन्द्र पाटील, कार्यालय अधिक्षक मयुर बेहरे, कर निरिक्षक दिपक खोब्रागडे, शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, नगरपंचायतीचे कर्मचारी, सफाई कामगार व गणमान्य व्यक्तींनी विशेष सहभाग घेतला होता.

 

               आपल्या भारत देशाच्या रक्षणासाठी ज्या वीर शूर सैनिकांनी देशासाठी लढत असताना सीमेवर बलिदान दिले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांची अमरज्योत ही कायम राहावी या उद्देशाने मेरी माटी मेरी अभियान संपूर्ण भारतात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज अमृत कलश यात्रा वाजतगाजत भातकुली नगरपंचायती मार्फत काढण्यात आली.

000000


DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...