Friday, December 29, 2023

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

 



कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

अमरावती दि. 29 : कोविड जेएन-वन या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्यात येईल .नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले .

कोविड - 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय आसोले तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

          कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन-वन या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. कटियार म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता नव्याने आलेल्या जेएन-वन या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्याने मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. जेएन-वन व्हेरियंट झपाट्याने वाढत आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शासकीय रुग्णालयात कोविड तपासणी सुविधेसाठी आरटीपीसीआर मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावे. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे याबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री. कटियार यांनी केले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील प्रशासकीय यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक घेतली. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी  तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घ्यावी. सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनीही या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी . जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाहीत. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा,  असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

00000

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम’ जास्तीत जास्त शाळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकरी अविश्यांत पंडा

 


‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम

जास्तीत जास्त शाळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा

-    मुख्य कार्यकारी अधिकरी अविश्यांत पंडा

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका) :  सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक ,पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे , यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. हे अभियान दि. 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविल्या जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत - जास्त शाळांनी या उपक्रमात सहभाग घेण्याच आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज येथे केले आहे.

           या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाहीचा आढावा जिल्हा परिषदेचे सभागृहामध्ये श्री. अविश्यांत पंडा यांच्याकडून घेण्यात आला. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय मुख्याध्यापकांच्या सभा घेऊन त्यांना या अभियानात सहभागी होण्याबाबत सूचित करण्यात आले.

          अभियानाचे कालबद्ध नियोजन करुन हे अभियान यशस्वी करावे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या अभियानामध्ये सहभाग घेऊन जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्राविण्य मिळवावे. या अभियानामध्ये सहभागी शाळांच्या कामागिरीच्या आधारे मुल्यांकन करण्यात येऊन त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ व ब च्या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र व उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र या गटांमध्ये मुल्यांकन करण्यात येणार आहे.

 

          अमरावती जिल्हा उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये मोडत असून या अंतर्गत तालुका, जिल्हा, विभागस्तर व राज्यस्तरावर शाळांचे मुल्यांकन होणार आहे. या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीतून शाळांची निवड होणार आहे.

           दोन्ही वर्गवारीतून तालुकास्तरावर पहिले बक्षिस 3 लक्ष रुपये, दुसरे बक्षिस 2 लक्ष रुपये व तिसरे बक्षिस 1 लक्ष रुपये असे आहेत. जिल्हास्तरावर पहिले बक्षिस 11 लक्ष रुपये, दुसरे बक्षिस 5 लक्ष रुपये व तिसरे बक्षिस 3 लक्ष रुपये असून विभागस्तरावर पहिले बक्षिस 21 लक्ष रुपये , दुसरे बक्षिस 11 लक्ष रुपये व तिसरे बक्षिस 7 लक्ष रुपये या प्रमाणे देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर पहिल्या बक्षिसांची रक्कम ही 51 लक्ष रुपये असून दुसरे बक्षिस 21 लक्ष रुपये व तिसऱ्या बक्षिसांची रक्कम 11 लक्ष रुपये अशी आहे.

          जिल्ह्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून जास्तीत -जास्त बक्षिसे मिळविण्याचा शाळांचा प्रयत्न आहे असे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी सांगितले. 

00000

जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

 


जिल्हा लोकशाही दिन येत्या सोमवारी

            अमरावती, दि. 29 (जिमाका): जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जानेवारी महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन सोमवार, दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे.

00000

वराहांवरील आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना

 

वराहांवरील आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना

वराहपालन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व जैव सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका) : अचलपूर तालुक्यातील मौजा फरमानपूर येथील मृत वराहाच्या घेण्यात आलेल्या नमुन्यामध्ये प्राप्त अहवालात आफ्रिकन स्वाईन फिवर हा रोग आढळून आलेला आहे. रोगाचा प्रार्दुभाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मौजा फरमानपूर या भागाचे एक कि.मी. परिघातील क्षेत्रास बाधितक्षेत्र व दहा कि.मी. परिघातील क्षेत्रास संनियंत्रण क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशित केले आहे. आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :

            बाधित क्षेत्राच्या एक कि.मी. परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करुन त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे  निर्जंतूकीकरण करावे. आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरातील सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाय योजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तूकीवर बारकाईने लक्ष ठेवावे. वराहाच्या मासाची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशू वैद्यकीय यांनी नियमित भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. तसेच वराहपालन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व जैव सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी .

            घरगुती तसेच हॉटेलमधील वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही बाब विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करुन कारणीभूत आहे. यामुळे वराहांना अशा प्रकारचे खाद्य देणे टाळावे. असे करणे अवघड असल्यास मांसविरहित (शाकाहारी) अन्न 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उकळून द्यावे. निरोगी वराहाच्या घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचऱ्याशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी.

            वराह पालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवून ठेऊ नये. सर्व कचरा नष्ट करावा अथवा त्याचे सार्वजनिक कचरा व्यवस्थापनांकडून शास्त्रोक्तदृष्ट्या योग्यरितीने विल्हेवाट लावावी.  वराह पालन करणारे पशूपालक या व्यवसायसंबंधी व्यक्ती जसे व्यापारी, वितरक, कसाई  यांच्यामध्ये या रोगाविषयक जागृकता निर्माण करुन रोगाच्या प्रादुर्भावाविषयी सूचना देणे व सुप्त संनिरीक्षण करण्यासाठी अवगत करावे.

            पशुपालकांना या रोगाची लक्षणे, संनिरीक्षण धोरण, रोग नियंत्रण उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलीस व चेक नाके यांच्याशी समन्वय ठेऊन शेजारील राज्यातील वराहांचे अनधिकृत प्रवेश होणार नाहीत , यांची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी  दिले आहेत.

00000

Wednesday, December 27, 2023

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी












 

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून रहावी

-         केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Ø  कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 वा जयंती उत्सव

Ø  खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान

अमरावती, दि. 27 : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह विदर्भातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचे जाळे निर्माण केले. यामुळे आज विद्यार्थ्यांना विविध ज्ञानक्षेत्राचा लाभ मिळत आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून रहावी, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयातील क्रीडांगणावर शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सत्कारमुर्ती खासदार शरद पवार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कन्व्हर्जन्स ऑफ नॉलेजबाबत मार्गदर्शन करताना श्री. गडकरी म्हणाले, माणूस त्याच्या गुणवत्तेतून मोठा होत असतो. वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व हे केवळ शिक्षणाने तयार होत नाही तर त्यासाठी संस्काराचे कोंदण आवश्यक आहे. संताचे चांगले विचार आणि मार्गदर्शनामुळे समाज प्रगल्भ होतो. डोळे दान करता येतात, परंतु दृष्टी दान करता येत नाही. यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्व-विकासासोबतच समाजाचाही विकास व्हावा, यासाठी युवकांनी प्रयत्नशील रहावे. आपला देश खेड्यात वसतो. येथील कृषीबांधव केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावे समृद्ध आणि स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. भाऊसाहेबांचे हेच स्वप्न होते. शेतकरी, गोरगरीब या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात येता यावे, यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणगंगा घरोघरी पोहचविली. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढींना मार्गदर्शन करीत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार शरद पवार यांच्या सारखा अभ्यासू आणि सम्यक व्यक्तीला पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. हा खऱ्या अर्थाने या पुरस्काराचा सन्मान आहे. श्री. पवार यांनी देशातील कृषी विकासाचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न केला. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन बी-बियाणे, जैव तंत्रज्ञान, खते व्यवस्थापन यांना प्रोत्साहन दिले. कृषी संशोधन, अन्नप्रक्रिया उद्योग व शेतीपुरक व्यवसायाला मार्गदर्शन केले. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन शेती उत्पादन वाढीसाठी उपयोग झाला, असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना खासदार श्री. पवार म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराचा प्रथम मान मला देण्यात आला, यासाठी मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा आभारी आहे. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कृषीक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. माझी आई ही देखील महिला शेतकरी होती. तिने शेतात कष्ट करुन आम्हा भावडांना मोठे करुन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. अन्य शेतकरी महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाचा सन्मान होणे गरजेचे आहे. यातून अन्य शेतकरी महिलांचा आत्मविश्वास दुणावेल, असेही ते यावेळी म्हणाले.

कृषिरत्न तसेच शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंती उत्सवानिमित्त भारत सरकारने निर्माण केलेल्या 125 रुपयाच्या नाण्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘शिवसंस्था’ मासिक, दैनंदिनी, दिनदर्शिका-2024, भाऊसाहेबांच्या जीवनावरील छायाचित्रांचे पुस्तक व चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अभ्यासिकेचे व डॉ. पंजाबराव देशमुख अध्यासन केंद्राचे उद्घाटन रिमोटची कळ दाबून ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नूतनीकृत स्मृतीभवन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नवीन ग्रंथालयाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. 5 लक्ष रुपयाचा धनादेश, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी संस्थेच्या विविध विद्याशाखेत गुणवंत ठरलेल्या मुलींना श्रीमती विमलाबाई देशमुख, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासवृत्ती प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. किशोर फुले तर आभार दिलीप इंगोले यांनी मानले.  

00000

--

जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन

 

जिल्हाधिकारी कार्यालयात 29 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिन

अमरावती, दि. 27 : राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी केंद्र शासनामार्फत ‘कंन्झ्युमर प्रोटेक्शन ईन द इरा ऑफ ई-कॉमर्स डिजीटल ट्रेड ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.

00000

अटल भुजल योजना; चांदुर बाजार येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

 

अटल भुजल योजना; चांदुर बाजार येथे तालुकास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

      अमरावती, दि. 27 (जिमाका): भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागामार्फत शुक्रवार दि. 22 डिसेंबर रोजी चांदुर बाजार येथील तहसील सभागृहामध्ये अटल भूजल योजना अंतर्गत तालुकास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.  यावेळी विविध विषय तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

          तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते जलपूजन करून करण्यात आले. यावेळी  उपविभागीय महसूल श्रीकांत उंबरकर, चांदुर बाजार तहसीलदार गीतांजली गरड, गट विकास अधिकारी मोहन शृंगारे आदी उपस्थित होते.

  ‘पाण्याचे मागणी व्यवस्थापन या विषयावर कृषी तज्ञ जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष दिनेश खडसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच योजनेतंर्गत शेतकरी मेळावा व तृणधान्य मेळावा ग्रामपंचायतस्तरावर सुरू असून त्यामध्ये ठिंबक व तुषार सिंचनाचे महत्व सांगितले. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून अनुदानाचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. ‘पाणी बचतीसाठी आंतरव्यक्ती संवाद या विषयावरील उपक्रमाबाबतची माहिती कृषी तज्ज्ञ नारायण फटिंग व अश्वमेघ यांनी दिली.  गावपातळीवर पाणी बचतीच्या उपाययोजना राबविण्यासाठीचे ‘आयसीई उपक्रम या विषयाची माहिती आयईसी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन प्रमोद झगेकर यांनी दिली. तसेच चांदुर बाजार तालुक्यात शालेय उपक्रमाअंतर्गत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित केल्याबाबत माहिती दिली. ग्रामपंचायत स्तरावर चित्ररथाच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात येत असून अटल भूजल योजनेंतर्गत भूजल ग्राम समृद्ध स्पर्धा राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.

भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाचे डॉ. केतकी जाधव यांनी प्रस्तावनेतून अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीची तालुक्यातील सद्यस्थिती, अटल भूजल योजनेअंतर्गत झालेल्या कामाची व नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणाचे सूत्रसंचालन प्रमोद झगेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण फुकट यांनी केले.

00000

अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना; योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अभय योजनेंतर्गत थकीत मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना;

 योजना दोन टप्प्यात राबविण्यात येणार:योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 27 (जिमाका): मालमत्तेचे हस्तांतरण करतांना नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या अथवा नोंदणी न केलेल्या दस्तांसाठी  अभय योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व दंड माफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा  दि. 1 डिसेंबर 2023 ते दि.31 जानेवारी 2024 आणि दुसरा टप्पा दि. 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा  मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी केले आहे.

अभय योजनेंतर्गत पहिल्या टप्पात सन 1980 ते 2000 या कालावधीत नोंदणीसाठी दाखल केलेले अथवा न केलेले दस्ताकरीता दि. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम रूपये 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपुर्ण रक्कम माफ केली आहे. देय होणारी रक्कम 1 लाख रुपयेवरील असल्यास 50 टक्के व दंडाच्या रक्कमेत संपुर्णत: 100 टक्के सुट देण्यात आली आहे. तर योजनेचा दुसऱ्या टप्पा कालावधीत दि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या काळात मुद्रांक शुल्क व दंड भरणा केल्यास देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडात 80 टक्के सवलत दिलेली आहे. देय होणारी रक्कम 1 लाखावरील असल्यास मुद्रांक शुल्कात 40 टक्के व दंडात 70 टक्के सवलत दिलेली आहे.

 

          पहिल्या टप्प्यात दि. 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीतील भरणा केल्यास देय होणारी रक्कम 1 ते 25 कोटी रुपये पर्यंतच्या असल्यास मुद्रांक शुल्कास 25 टक्के माफी व देय होणारी दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा कमी असल्यास दंड रक्कमेस 90 टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम ही 25 कोटी पेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कास 20 टक्के व दंड रक्कम एक कोटी स्विकारण्यात येईल व उर्वरीत रक्कमेस सुट देण्यात येईल. दुसऱ्या टप्पा दि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत या कालावधीत भरणा केल्यास देय होणारी रक्कम 1 ते 25 कोटी रुपये असल्यास देय होणारी मुद्रांक शुल्कातुन सुट 20 टक्के देय राहील. तसेच दंड रक्कमेस 50 लक्ष पेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या मुद्रांक शुल्कातुन सुट 20 टक्के देय राहील. तसेच दंड रक्कम 50 लक्षा पेक्षा कमी असल्यास देय होणाऱ्या दंडामध्ये 80 टक्के सुट देण्यात येईल. दंडाची रक्कमेची पन्नास लाख पेक्षा जास्त असल्यास केवळ 50 लाख दंड म्हणून स्विकारण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात रक्कम 25 कोटीपेक्षा अधिक असल्यास मुद्रांक शुल्कात 10 टक्के सुट व दंडात दोन कोटी रुपये रक्कम दंड म्हणुन स्विकारण्यात येईल व उर्वरीत दंडाच्या रक्कमेत सुट देण्यात येईल.

          अभय योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ज्यांना मुद्रांक शुल्काची नोटीस प्राप्त झाली आहे, तसेच ज्यांनी त्यांचे अनोंदणीकृत दस्तऐवजांवर आवश्यक मुद्रांक शुल्क शासनास अदा केले नसेल अशाना या कालावधीतील सर्व दस्तऐवजांना ही सवलत लागू राहिल. त्यामुळे संबंधित पक्षकार यांनी त्यांचे मुळ दस्तांसह विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावा. तसेच शासनाने जाहीर केलेल्या या सवलत  योजनेचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;दावे व हरकती दि.12 जानेवारीपर्यंत निकाली काढण्यास मुदतवाढ

 

मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम;दावे व हरकती दि.12 जानेवारीपर्यंत निकाली काढण्यास मुदतवाढ

अमरावती, दि. 27 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमामध्ये निवडणूक आयोगाने अंश:त बदल करुन सुधारित कार्यक्रमानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचे शुक्रवार दि. 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.

सुधारीत कार्यक्रम याप्रमाणे : दावे व हरकती शुक्रवार दि. 12 जानेवारीपर्यंत निकालात काढणे.  बुधवार दि. 17 जानेवारी 2024 पर्यंत मतदार यादीचे तपासणे आणि अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे तसेच डेटा बेस अद्यावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे.  तर अंतीम मतदार यादी सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्धी होईल.

00000

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

 



जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

 

            अमरावती, दि. 27 (जिमाका): देशाचे माजी कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

         यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनीही स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

00000


Tuesday, December 26, 2023

रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा अमरावती जिल्हा दौरा

 


रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचा अमरावती जिल्हा दौरा

अमरावती, दि. 26 (जिमाका): रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे आज,  दि. 27 डिसेंबर 2023 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौरा  पुढीलप्रमाणे :

बुधवार, दि. 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन व  अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पाहणी. दुपारी 2.30 वाजता श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, पंचवटी चौक, अमरावतीकडे प्रयाण व आगमन.  दुपारी 3 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख यांची 125 व्या  जयंती निमित्त शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथील कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळ 4.30 वाजता श्रीकृष्ण पेठकडे प्रयाण. सायंकाळ 4.35 वाजता महिन्द्रा राहटगांवकर यांचा निवासस्थानी सदिच्छा भेट. दुपारी 4.50 वाजता अमरावती बेलोरा विमानतळकडे प्रयाण. सायंकाळ 5.15 वाजता अमरावती बेलोरा विमानतळ, अमरावती येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

00000

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू;30 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

सहकारी व्यवस्थापन पदविकासाठी प्रवेश सूरू;30 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 26 (जिमाका) : सहकारी संस्थांमध्ये काम करण्यासाठी सहकारी व्यवस्थापन पदविका अनिवार्य केले आहे. या अभ्यासक्रमासाठी भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे दि. 1 जानेवारी ते 30 जुन 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. इच्छुकांनी दि. 30 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन  भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांनी केले आहे.

सहकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कामकाज सांभाळून हा अभ्यासक्रम दुरूस्थ शिक्षण पध्दतीने पुर्ण करता यावा. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सहकार क्षेत्रातील विविध सहकारी संस्थामध्ये या पदविका अभ्यासक्रमामुळे नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाने 13 सहकार प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन हा अभ्यासक्रम पोस्टल पध्दतीने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुर्ण अंतर्गत भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे दि. 1 जानेवारी 2024 ते 30 जुन 2024 या मुदतीसाठी प्रवेश देणे सुरू आहे. त्यासाठी प्राचार्य भाऊसाहेब भोकरे सहकार प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्याशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी 9881047668 या क्रमांक संपर्क साधावा.

00000

 

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 28 डिसेंबर रोजी 91 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

 

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 28 डिसेंबर रोजी

91 रिक्तपदांवर होणार भरती; युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

 

              अमरावती, दि. 26 (जिमाका): अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’चे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ गुरुवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

           जिल्ह्यातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्यात "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

91 रिक्तपदांसाठी राबविणार भरती प्रक्रिया

         या मेळाव्यामध्ये 91 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 1) क्रेडिट ॲक्सेस ग्रा. लि. अमरावती येथे ट्रेनी केंद्र मॅनजरची 60 पदे(स्त्री/पुरुष), 2) करियर पॉईट कोटा अमरावती येथे लेक्चररचे 4 (स्त्री/पुरुष), 3) स्थापत्य कंसल्टंसी  अमरावती येथे सर्वेअरचे 10 (पुरुष), 4) टेंडर मित्रा प्रा. लि. अमरावती येथे असोसिएटचे 2 (स्त्री/पुरुष), 5) रेडीयंट सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल अमरावती येथे परिचारीका, आर. एम. ओ., फिजीओथेरपिस्ट, अटेंडंटची (स्त्री/पुरुष)  15  पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  अशा एकूण 91 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

            या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी  https://rojgar.mahaswayam.gov.in/#/searchresult   या लिंकवर  जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. अथवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.             यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे. Job Seeker (Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. JOB SEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक,आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGIN व्हावे. त्यांनतर Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. अमरावती जिल्हा निवडून फिल्टर द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्ह्यातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते. त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -8, दि. 28/12/2023 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List या टॅबवर क्लिक करावे. ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील. त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.

 

         याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. तसेच 28 डिसेंबर रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, बस स्टँड रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.

00000

 

 

 

 

Thursday, December 21, 2023

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

 

शहरात  कलम 37 (1)  व (3) लागू

 

            अमरावती, दि. 21 (जिमाका):  शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त  (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

              सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात  लागू  करण्यात आला असून तो दि. 23 डिसेंबरचे मध्यरात्रीपासून ते दि. 6 जानेवारी 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)  नविनचंद्र रेड्डी  यांनी कळविले आहे.

000000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करा

 

        अमरावती, दि. 21 (जिमाका) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणारी भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2023-24 या वर्षातील नवीन प्रवेशित व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज घेणे सुरू झाले आहे. तरी सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या विद्यार्थ्यांनी swadharyojana.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. विद्यार्थांनी अर्जाची हार्डकॉपी सर्व हार्डकॉपी सर्व कागदपत्रासह दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे आवाहन  सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

*****

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक, नवयुवतीसाठी     दि. 8 ते 17 जानेवारी, 2024 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 56 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

 

अमरावती जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती येथे दि. 3 डिसेंबर 2024 मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येते वेळी सैनिक कल्याण विभाग, पूणे (Department of Sainik Welfare, Pune) या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-56 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन यावेत. अ) कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन(CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अकॅडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. ब) एनसीसी सी सर्टिफिकेट ‘ए’ किंवा ‘बी’ ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. क) टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. ड) युनिर्व्हसिटी एन्ट्री स्कीम (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी- training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. 0253-2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी केले आहे.

000000

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार







‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;

प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): शासकीय योजनाची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचून त्यांना सहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन अमरावती येथे लवकरच करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय विभागांनी समन्वय साधून जिल्हास्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी.एम. मिनू, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, प्रदीप पवार, मनोज लोणारकर, रविंद्र जोंगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणतांना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमस्थळी स्वच्छता विषयक व्यवस्था, शौचालय सुविधा, वीज, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, खाद्यान्ने तसेच पाणी, आसन व्यवस्था याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी. फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेट्सची व्यवस्था तसेच आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर नियोजन करावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले.

00000 

‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ

 





‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणा मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ईव्हीएम प्रात्यक्षिक सेंटरचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मतदारांनी या यंत्रणेची प्रात्यक्षिके पाहून शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अमरावती येथे ‘ईव्हीएम व व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्राचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी.एम. मिनू, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, प्रदीप पवार, मनोज लोणारकर, रविंद्र जोंगी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांच्यासह गटविकास अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील सर्व आठ मतदार संघामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पुरविण्यात आलेल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक मतदार संघाचे मुख्यालयी ईव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर उघडण्यात आले असून ईव्हीएम मशीन्स प्रात्याक्षिक करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच प्रत्येक मतदार संघामध्ये प्रसिध्दीसाठी दोन मोबाईल  डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन देण्यात आल्या आहेत.

 

मतदारांना मतदान यंत्रांची प्रक्रिया स्वत: बघावी  प्रारूप मतदान करून त्यांनी केलेले मतदान   व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे पडताळून बघता यावे, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत सर्व शंकाचे निरसन करता यावे, या उद्देशाने मतदान यंत्र मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅन गावोगावी फिरून जनजागृती करणार आहे.
नागरिकानी जनजागृती मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅनच्या
 माध्यमातुन प्रारूप मतदान तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत असणाऱ्या सर्व शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

00000

Wednesday, December 20, 2023

कृषी पुरस्कारःप्रस्ताव मागविले

कृषी पुरस्कारःप्रस्ताव मागविले

 

            अमरावती, दि. 20 (जिमाका): कृषी विभागामार्फत कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकरी,व्यक्ती, संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण, कृषी भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक  शेतीमित्र, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार व युवा शेतकरी पुरस्कार देऊन दरवर्षी  गौरविले जाते.

 

सन 2023 या वर्षासाठी पुरस्काराचे प्रस्ताव कृषी विभागाने मागविले असून प्रस्ताव दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठवावयाचे आहेत. शेतकऱ्यांनी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याकरिता व अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक ,कृषी पर्यवेक्षक किवा नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा  अधीक्षक  कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

०००००

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...