एका दिवसात 1078 बसेसद्वारे कोकणवासीयांना आणले सुखरूप घरी
मंत्री दिवाकर रावते यांनी मानले एसटी कर्मचाऱ्यांचे आभार
मुंबई, दि. 19 : गणपती उत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या मुंबईच्या चाकरमान्यांना सुखरूप घरी आणण्यात एसटीने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली असून आज (19 सप्टेंबर रोजी) कोकणातून 1 हजार 78 जादा बसेस भाविक प्रवाशांना घेऊन मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा रेल्वेनेही जादा गाड्या सोडल्या होत्या. कोकणवासीयांनी थेट आपल्या घरापासून उपलब्ध असलेल्या एसटीच्या वाहतुकीवर विश्वास दाखवत जादा बसेसना चांगला प्रतिसाद दिला. ही सर्व वाहतूक सुनियोजितरित्या आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आभार मानले आहेत. या संपूर्ण वाहतुकीमध्ये सुनियोजितता आणण्यासाठी ज्या परिवहन विभागाने व महामार्ग वाहतूक पोलिसांनी कष्ट घेतले त्यांचेही मंत्री श्री. रावते यांनी आभार मानले आहेत.
दिनांक 17 सप्टेंबरपासून कोकणातील चाकरमान्यांचा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या विभागातून तब्बल 2 हजार 200 जादा एसटी बसेसचे आरक्षण नोंदणी झाले आहे. काल एका दिवसात तब्बल 1 हजार 77 जादा एसटी बसेस सुमारे 50 हजार पेक्षा अधिक गणेश भक्तांना घेऊन सुखरूपपणे मुंबईमध्ये दाखल झाल्या. कोकणातील दोडामार्ग ते बांद्यापासून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन पर्यंतच्या कोकणवासियांना एसटीने मुंबईत सुखरुप आणले. या सर्व बसेसची एकत्रीत लांबी ही पनवेलपासून वडखळपर्यंत म्हणजे सुमारे 25 किलोमीटर इतकी झाली असती.
याबरोबरच दररोज कोकणातून सुटणाऱ्या 300 ते 350 नियमित बसेसचे आरक्षण देखील 23 तारखेपर्यंत आरक्षीत झाले आहे. हा प्रतिसाद पाहता कोकणवासीयांनी पुन्हा एकदा एसटीला अधिक पसंती दिल्याचे दिसून येते. या शिस्तबद्ध सुरक्षित आणि सुनियोजित वाहतुकीबद्दल मंत्री श्री. रावते यांनी एसटीचे वरिष्ठ अधिकारी, पर्यवेक्षक व सर्व कर्मचाऱ्यांबरोबरच परिवहन व पोलीस प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.
माणगावमधील अरुंद रस्त्यामुळे यंदा एसटीच्या वाहतुकीला थोड्या प्रमाणात विलंब झाला. त्यामुळे या ठिकाणी वळण रस्ता (बायपास) काढणे आवश्यक आहे. याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करु, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.
Comments
Post a Comment