सणांचा काळ लक्षात घेता वाहतुकीचे काटेकोर व्यवस्थापन करावे
- जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश
अमरावती, दि. 10 : आगामी काळातील गणेशोत्सव आदी सणांच्या अनुषंगाने होणारी गर्दी व वाहतूक लक्षात घेता शहर व जिल्ह्यात वाहतूक यंत्रणेने अधिक काटेकोरपणे काम करावे, असे निर्देश जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत आज देण्यात आले.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार डॉ. अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गीत्ते, सा. बां. विभागाचे श्री. साळवे, परिवहन अधिकारी श्री. कोठाळे आदी उपस्थित होते.
श्री. अडसूळ म्हणाले की, सणांचा काळ लक्षात घेता शहर व जिल्ह्यात रहदारीचे योग्य व्यवस्थापन ठेवावे. आवश्यक तिथे गतीरोधक व सिग्नल लावण्याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी. विशेषत: गणेशोत्सव लक्षात घेता शहरात काही ठिकाणी सायंकाळच्या वेळी गर्दी वाढते. ते लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा सतर्क ठेवावी.
डॉ. देशमुख म्हणाले की , शहरात रस्त्यांचे काम सुरु आहे. ते लक्षात घेऊन वाहतुकीचे काटेकोर नियोजन करावे. वाहतूक पोलीसांनी याबाबत सजग असले पाहिजे. अधिका-यांनी केवळ कर्मचा-यांवर विसंबून न राहता प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थापन सतत तपासत राहिले पाहिजे. ग्रामीण भागात रिक्षा चालविण्याचा परवाना असलेले रिक्षाचालक महानगरात वाहतूक करत असल्याची तक्रार आहे. ही बाब तपासण्यासाठी परिवहन विभागाने व पोलीसांनी मोहिम आखावी, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) दीर्घकालीन उपाययोजनेला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
Comments
Post a Comment