कुपोषणाने एकही बालक दगावू नये यासाठी शासनाच्या उपाययोजना कातकरींना शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पालघर, दि. 6 : पालघर हा निसर्ग संपन्न जिल्हा आहे. तथापि कुपोषणामुळे तो अधिक चर्चेत राहिला. कुपोषण हा आकडेवारीच्या पलिकडचा प्रश्न असून एकही बालक कुपोषणाने दगावू नये यासाठी शासन उपाययोजना करीत आहे. त्यादृष्टीने कातकरींना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जव्हार येथे सुरू असलेल्या संजीवन बाल उपचार केंद्रास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, खासदार राजेंद्र गावित, कपिल पाटील, आमदार पास्कल धनारे, अमित घोडा, रवींद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, माजी आमदार विवेक पंडित,आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, आदिवासींबाबतच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहे. त्यास अजून गती देण्यात येईल. कुपोषणाने दगावणाऱ्या मुलांकडे आकडेवारी म्हणून न पाहता ती जीवंत माणसे आहेत, त्यामुळे एक बालक दगावले तरीही ती समस्या गंभीरच असल्याचे मी मानतो. आदिवासींचे स्थलांतर होऊ नये यासाठी रोजगार वाढविण्यावर शासनाचा भर आहे. रोजगाराचे पैसे वेळेवर देणे, जलसंधारणाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे याला शासन प्राधान्य देत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घर देण्याची केंद्राची योजना असून प्रत्येक कातकरी कुटुंबाला एका वर्षात घर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
श्री.फडणवीस म्हणाले, जिल्हा प्रशासनामार्फत कातकरी उत्थान अभियान राबविण्यात येत असून यामाध्यमातून घरोघरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यामुळे आदिवासींच्या जीवनात स्थैर्य येऊन कुपोषणाची आणि आरोग्याची समस्या कमी होण्यास निश्चितच मदत होईल. शासन आणि समाज एकत्र आले तर ही समस्या सोडविण्यासाठी वेळ लागणार नाही. यादृष्टीने श्री विठू माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माजी आमदार विवेक पंडित करीत असलेले काम मोलाचे आहे. त्यांनी केवळ समस्या मांडल्या नाहीत तर बाल उपचार केंद्राच्या माध्यमातून काम केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुकोद्गार काढले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी केंद्रात दाखल मुलांची पाहणी केली. तर मुख्यमंत्र्यांना आदिवासींनी बनविलेली गोधडी आणि हातसडीचे तांदूळ भेट देण्यात आले.
Comments
Post a Comment