अधिकारी- कर्मचा-यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश
अधिकारी- कर्मचा-यांना मुख्यालयी राहण्याचे निर्देश
अमरावती, दि. 15 : जिल्ह्यातील कर्मचा-यांनी रोज गावाहून ये-जा न करता आपल्या कार्यालयाच्या ठिकाणीच राहावे, असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. काही कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी विविध तालुक्यांतून ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्मचारी रेड झोनमधून प्रवास करत असल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचा-यांनी आपल्या कार्यालयात जाण्यासाठी गावाहून ये-जा न करता तिथेच राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
याबाबत विभागप्रमुखांनीही आपल्या कर्मचा-यांना सूचना द्यावी. कर्मचा-यांनी कार्यालयाच्या ठिकाणीच निवास करणे बंधनकारक आहे. सदर सूचनेचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
00000
Comments
Post a Comment