Friday, September 23, 2022

व्यावसायिकांनी 30 सप्टेंबरपूर्वी अभय योजनेचा लाभ घ्यावा वस्तू व सेवा कर विभागाचे आवाहन

 

व्यावसायिकांनी 30 सप्टेंबरपूर्वी अभय योजनेचा लाभ घ्यावा

वस्तू व सेवा कर विभागाचे आवाहन

 

अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्य शासनाच्या जीएसटी विभागाने जाहीर केलेली विक्री कराची अभय योजना 2022 ला संपूर्ण राज्यभरातील व्यापारी वर्गातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यात 22 सप्टेंबरपर्यंत विभागाकडे थकबाकी प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यांपैकी जवळपास 50 टक्के म्हणजे दीड लाखापेक्षा जास्त व्यापाऱ्यांना या अभय योजनेचा लाभ झाला आहे. यंदा 1 एप्रिलला ही योजना सुरु झाली असून ‘जीएसटीपूर्व कायद्याच्या थकबाकीतून बाहेर पडण्याचा मार्ग’ असे या योजनेचे वर्णन करण्यात येत आहे.

छोट्या व्यापाऱ्यांसाठी आकर्षक सवलती

अभय योजनेत छोटे व्यापारी विशेषत: ज्यांची थकबाकी 10 हजारांपर्यंत आहे, त्यांनी अर्जही दाखल न करता त्यांची पूर्ण थकबाकी माफ करण्यात आली. अधिकाधिक व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित थकबाकीतून मुक्तता मिळविली आहे. मोठ्या म्हणजेच 50 लक्षांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी हप्ते वसुलीसारखा सोयीचा पर्याय उपलब्ध असल्याने यास चांगला प्रतिसाद लाभत आहे.

अभय योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत

सर्वसामान्य व्यावसायिकांच्या थकबाकीला स्थगिती नसेल तर स्थावर व जंगम मालमत्ता लिलावात निघू शकते. अशावेळी अपिलात होणारा वेळेचा व पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी व्यावसायिकांनी अभय योजनेत सहभागी व्हावे. ही अभय योजना 30 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे योजनेच्या शेवटच्या आठवड्यात उर्वरित थकबाकीदारांपैकी अधिकाधिक व्यापारीबंधूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक राज्यकर आयुक्त ध.ज. पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...