छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
कर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी
अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 5: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांसाठी 14 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार असून, पात्र शेतक-यांनी वनटाईम सेटलमेंटमध्येही रक्कम भरण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्याचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर व जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी केले.
काही वैयक्तिक किंवा तांत्रिक कारणांमुळे शेतक-यांना मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. हे लक्षात घेऊन अर्ज करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्याचा लाभ शेतकरी बांधवांनी घ्यावा, तसेच मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) योजनेंतर्गत पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे, असे श्री. बांगर यांनी सांगितले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत माहिती भरून ऑनलाईन अर्ज करता येईल. https://csmssy. mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करता येतील. योजनेंतर्गत यापूर्वी अर्ज केलेल्या शेतक-यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment