आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे
महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम, सुसज्ज
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद,दि. 21(जिमाका)---महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वात मोठा पोलीस दल असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाद्वारे पोलिस यंत्रणा अधिक गतिमान आणि सक्षम, सुसज्ज झाली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
एमजीएम कॅम्पसच्या द्योतन सभागृहात महाराष्ट्र पोलिस दलाच्या डिजिटल आणि स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत तयार करण्यात आलेल्या एम पोलीस, ई-समन्स आणि यथार्थ या तीन ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रवींद्र बोर्डे, पोलिस महासंचालक सतीश माथूर, विशेष पोलिस महानिरीक्षक मिलींद भारंबे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षात पोलीस दलाच्या कार्यद्धतीत अमुलाग्र बदल करण्यात येत असून शास्त्रीय, तांत्रिक पद्धतींचा वापर करुन गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यास मदत झालेली आहे. पोलीस स्टेशन मध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात महाराष्ट्र राज्य पहिले असून 2015 ते 2016 या एका वर्षात पोलिस स्टेशनमध्ये सीसीटिव्ही बसवण्याचे काम 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे, असे सांगून श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, डिजिटलायझेशनचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येत असून त्याद्वारे लोकांना त्रास न देता कायदा आणि सुव्यवस्था राखणे, सीसीटिव्हीमुळे ई-चलानद्वारे नियम तोडणाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करत नियमांचे पालन करण्यास नागरिकांना प्रोत्साहीत करणे, ई-तक्रारद्वारे मोबाईलवरुन आपली तक्रार पोलिसांकडे करणे. या गोष्टी मोठया प्रामणात शक्य होत आहे, असे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
सेवा देण्याचे काम पोलिस दल करते, ही सेवा अधिक दर्जेदार देणे तंत्रज्ञानामुळे शक्य होत असून या पार्श्वभूमीवर ‘यथार्थ’ ॲप सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत पोलीस तपास अधिक पारदर्शकरित्या करणे शक्य होणार आहे. प्रामुख्याने साक्षीदारांच्या फितूर होण्यावर नियंत्रण येऊन घडलेल्या गुन्ह्यात संबंधित आरोपीला योग्य ती शिक्षा देता येईल. त्याचप्रमाणे ‘ई-समन्स’ या ॲपमुळे अधिकृतपणा व्यापक प्रमाणात येण्यास, ‘एम पोलीस या ॲपद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या विश्लेषणातून व्यक्तीची क्षमता, गुणवत्ता लक्षात घेता पोलीस दलाची कार्यक्षमता, उत्तरदायित्व अधिक प्रमाणात वाढवण्यास या सर्व ॲपचा निश्चितच लाभ होईल, असे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.
अनुभवी न्यायमुर्ती, अधिकारी यांचे अनुभव कार्यशाळेद्वारे काम करणाऱ्यांपर्यंत पोहचविल्यास त्याचा फायदा होईल. यादृष्टीने अशापद्धतीच्या कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे. पोलिसांच्या घरासाठी मोठ्या प्रमाणात काम सुरु असून पोलिसांना स्वत:च्या मालकीचे घर घेण्यासाठी कर्जवाटप करण्यात येत असून त्याचे व्याज राज्यशासन भरणार आहे. त्यादृष्टीने संबंधित वरिष्ठांनी या कामाकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात एम पोलिस, ई-समन्स आणि यथार्थ या तीन ॲपचे विस्तुत सादरकीकरण केले. एम पोलीस या ॲपद्वारे कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामाचे नियोजन करण्यासह सुट्ट्या व इतर प्रशासकीय बाबी पाहता येणार आहे. ई-समन्य ॲपच्या माध्यमातून व्हाट्सॲप, ई-मेल आणि एसएमएसद्वारे समन्स पाठवता येणार आहे. यथार्थ ॲपद्वारे गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचे फोटो आणि व्हीडीओ शूटींग करण्यात येणार आहे. महिलांशी संबंधित गुन्ह्यांत फिर्यादीचे व्हीडीओ रेकॉर्डींगही या ॲपमध्ये करण्यात येणार आहे. यातील पुरावे हे पोलिसांना थेट न्यायालयात सादर करता येतील.
कार्यक्रमास महापौर नंदकुमार घोडेले, खासदार चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जजील, आ. संजय शिरसाट, आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर,जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, पोलिस अधीक्षक आरती सिंह यांच्यासह इतर संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****
Comments
Post a Comment