औरंगाबाद-जालना उद्योग परिसर
जगातले गतिमान विकसित क्षेत्र बनेल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद,दि.21(जिमाका) : औरंगाबाद व जालना परिसरातील शेंद्रा, बिडकीन, डीएमआयसी, ड्रायपोर्ट यासारख्या औद्योगिक क्षेत्रांमुळे येत्या पाच वर्षात हा भाग जगातला सर्वात गतिमान विकसित क्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
औरंगाबाद येथील निर्लेप उद्योग समुहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाळुजच्या मराठवाडा ॲटो क्लस्टरच्या नानासाहेब भोगले सभागृहात आयोजित समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रिय वाणिज्य, उद्योग व नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू, विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निर्लेप उद्योग समुहाने 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, निर्लेपने आपल्या अभिनव वस्तुंची निर्मिती व बाजारपेठ मिळवण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर हे यश संपादन केले असून हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. चांगल्या वस्तू आणि उत्तम बाजारपेठ मिळविल्यामुळे हा ब्रँड जगात नावारूपास आला. त्यामागे भोगले परिवाराचे एकत्रित प्रयत्न फार महत्वाचे आणि कौतूकास पात्र आहेत. परिवाराने एकत्र येवून उद्योग समूह नावारूपास आणण्याची परंपरा जपानमध्ये जास्त आहे. भोगले परिवाराचे हे यश इतरांना प्रोत्साहित करणारे आहे, असेही ते म्हणाले.
औरंगाबाद आणि मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला केंद्र व राज्य शासन गती देत असून औरंगाबाद – जालना परिसरातील औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित करताना येथील औद्योगिक संघटना व उद्योजकांचे मोठे प्रयत्न राहिले असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबादच्या औद्योगिक संघटना व उद्योजक तुलनेने सर्वाधिक उपक्रमशील असल्याचे सांगितले. आपल्या भागाचे मागासलेपण दूर करण्याची धमक उद्योजकांकडे असल्याचेही ते म्हणाले.
गेल्या साडेतीन वर्षात अनेक उद्योगसमुहांशी चर्चा केली, भेटी घेतल्या. जगातले उत्तम क्लस्टर औरंगाबादला होत आहे. येत्या काळात या भागात जगभरातून मोठ्या प्रमाणात उद्योग येणार आहेत. पुण्याशी स्पर्धा करण्याची क्षमता औरंगाबादच्या उद्योगामध्ये आहे. येथील निर्यातक्षम ॲटो कंपोनन्ट पुरवठा करण्यामध्ये हे क्षेत्र पुढे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
उद्योग विकास आणि रोजगार निर्मिती संदर्भात केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभु यांच्या सोबत बैठक घेण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोघांचेही मराठवाड्यातील औद्योगिक विकासाकडे विशेष लक्ष असल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या माणसांमध्ये विशेष प्रकारचे वैविध्य जाणवते. हा परिसर मागास असला तरी येथील लोकांमध्ये मागासलेपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची विचारधारा रूजलेली आहे. सरकारी मदतीशिवाय प्रगतीची कास धरण्याची धमक या परिसरामध्ये आहे. 50 वर्षात निर्लेपने मिळवलेले यश हे त्याचेच उदाहरण आहे. मराठवाड्याचा इतिहास लिहितांना याचा नक्कीच उल्लेख करावा लागेल, असे सांगून त्यांनी महाराष्ट्र हे एफडीआय व परदेशी गुंतवणुकीमध्ये क्रमांक एकचे राज्य बनले असल्याचे सांगितले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. निर्लेपने संशोधन व स्टार्टअप मध्ये 50 वर्ष सातत्य ठेवले आहे. देशभरातला हा सुयोग्य स्टार्टअप म्हणावा लागेल असेही श्री. प्रभू म्हणाले. औरंगाबादेत गुंतवणूक व्हावी यासाठी आम्ही डावोसमध्ये अनेकांना भेटत होतो. औरंगाबाद हे खऱ्या अर्थाने जगाला पटलेली ओळख आहे. नजिकच्या काळात मोठी गुंतवणूक औरंगाबादमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रारंभी निर्लेप उद्योग समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकुंद भोगले यांनी प्रास्ताविकात सुवर्ण महोत्सवी निर्लेपच्या वाटचालीची माहिती दिली. राम भोगले व परिवाराने मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे आणि खासदार चंद्रकांत खैरे यांची भाषणे झाली. यावेळी निर्लेपच्या वाटचालीविषयी माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. या समारंभास महापौर नंदकुमार घोडेले, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, गजानन कुचे, संजय शिरसाट, उपमहापौर विजय औताडे, विभागीय आयुक्त डॉ पुरूषोत्तम भापकर,पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, जिल्हाधिकारी उदय चौधरी तसेच लोकप्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते.
Comments
Post a Comment