छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
कर्जमाफी योजनेसाठी अर्ज न केलेल्या शेतक-यांनी लाभ घ्यावा
- पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 2: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतक-यांसाठी 14 एप्रिलपर्यंत अर्ज करण्यास संधी देण्यात आली असून, त्याचा अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी केले आहे.
कुणीही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे, असे सांगून श्री. पोटे- पाटील म्हणाले की, यापूर्वी खरीप हंगाम चालू असल्याने, तसेच काही वैयक्तिक किंवा तांत्रिक कारणांमुळे शेतक-यांना मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. हे लक्षात घेऊन अर्ज करण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा शासनाचा निर्धार आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले.
‘ वनटाईम सेटलमेंट’मध्ये रक्कम भरण्यास मुदतवाढ
मुद्दल व व्याजासह दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) योजनेंतर्गत पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना स्वत: किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत माहिती भरून ऑनलाईन अर्ज करता येईल. https://csmssy.mahaonlin e.gov.in या पोर्टलवर नोंदणी व अर्ज सादर करता येतील. योजनेंतर्गत यापूर्वी अर्ज केलेल्या शेतक-यांना पुन्हा अर्ज करता येणार नाहीत, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment