बाळासाहेब पवार म्हणजे सहकार, शिक्षणातील
सेवाभावी वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्व
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाद, दि. 21 (जिमाका) - “नीतिधुरंधर” या चरित्रग्रंथाचे वाचन केल्यावर बाळासाहेब पवार हे सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीने काम करणारे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब अनेकांनी करावा असं ते व्यक्तिमत्व होतं, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मराठवाड्यातील समाजकारण व राजकारणातील अव्दितीय व्यक्तिमत्व बाळासाहेब पवार यांच्या नीतिधुरंधर या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते येथील जगतगुरु तुकाराम सभागृह येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, चरित्रग्रंथाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, प्राध्यापक रा. रं. बोराडे, महापौर नंदकुमार घोडेले हे उपस्थित होते.
सर्वप्रथम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठवाड्यातील या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, जरी या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांची प्रत्यक्ष भेट होवू शकली नाही, तरी या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून मला हे व्यक्तिमत्व समजले. मराठवाड्यातील विविध आंदोलनांचे दाखले आजही बाळासाहेबांच्या नावाने दिले जातात, यातच या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची उंची लक्षात येते. बाळासाहेब पवारांनी सामाजिक आणि राजकीय वाटचालीत स्वाभिमान जपून, अपयश आले तरी खचून न जाता आपल्या भागातील माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले, असे सांगून श्री. फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या कोणत्याही कामाप्रती त्यांच्या व्रतस्थ स्वभावाचे सर्वांनी अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री कोण असावा या भूमिकेसाठी न्यायरितीने, अभ्यासूवृत्तीने संघर्ष स्वीकारणारे, प्रामाणिक तळमळ असणारे हे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात परंपरा, धार्मिक प्रथा जपल्या आणि हे करताना कुठेही जातीभेद, धर्मभेद अंगिकारला नाही. समाजकारण, राजकारण करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी हा चरित्रग्रंथ जरुर वाचावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना केले. आणि या चरित्रग्रंथामुळे एका महनीय व्यक्तीचा परिचय झाला, याबद्दल लेखकाप्रती आणि या चरित्रग्रंथाशी संबंधित अन्य व्यक्तींविषयी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक या चरित्रग्रंथाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनीही या चरित्रग्रंथाविषयी केलेल्या प्रस्तावनेबाबत मनोगत व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळयास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, बाळासाहेब पवारांचे सुपूत्र मानसिंग पवार, मंगलसिंग पवार यांच्यासह औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय दिग्गज,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याची सुरुवात “ वैष्णव जन ते.. ” या भजनाने झाली तर समारोप पसायदानाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. रुपेश मोटे यांनी केले.
Comments
Post a Comment