Thursday, August 31, 2023

जिल्हा दक्षता समितीचा अपर जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

 



जिल्हा दक्षता समितीचा अपर जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा


    अमरावती, दि. 31: अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात आलेल्या आर्थिक सहाय्य व प्रलंबीत प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात समितीची सभा पार पडली. 


सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा(शहर) राहुल आठवले, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा (ग्रामीण)अर्जुन ठोसरे, शासकीय अभियोक्ता प्रफुल तापडीया, संबंधित पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .


दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे जुलै 2023 पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला . तसेच माहे जुलैमध्ये शहरी विभागात एकूण 4 तर ग्रामीण भागात 5 अशा एकुण 9 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणे तसेच जिल्हा दक्षता समितीवर अशासकीय सदस्य घेण्याबाबतचा आढावा  यावेळी घेण्यात आला.


प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या. तसेच निधी अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत निर्देश श्री. वाघमारे यांनी दिले.

000000

अखर्चित निधीचा अहवाल तत्काळ सादर करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 





जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा नियोजन समितीचा आढावा;

अखर्चित निधीचा अहवाल तत्काळ सादर करा

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2021 व 2022 या आर्थिक वर्षातील अखर्चित निधी व शिल्लक असलेला निधीचा अहवाल तत्काळ जिल्हा नियोजन कार्यालयाकडे सादर करावा. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षातील नियोजनानुसार नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण होण्यासाठी प्रस्ताव देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

जिल्हा वार्षिक योजनेत खर्च व नियोजित कामांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी नियोजन भवनातील बैठकीत घेतला, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त देवीदास पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के यांच्यासह विविध विभाग प्रमुख, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सन 2021 व 2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत करण्यात आलेली मंजूर कामे, प्राप्त निधी, झालेला खर्च कामांची सद्यस्थिती, उपयोगिता प्रमाणपत्र व निधी शिल्लक असल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण, सन 2023-24 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत कामांचे नियोजन, स्पिल निधी मागणी व नियोजित कामांचा अंदाजपत्रकीय रकमेसह संपूर्ण प्रस्ताव मागविण्यात आले. तसेच  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अमरावती जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दि. 18 जानेवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित झालेल्या मुद्यांचे संबंधित यंत्रणेचे अनुपालन अहवाल, जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचा आढावा या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

 

जिल्हा विकास आराखड्याबाबत सादरीकरण जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मस्के यांनी केले. प्रस्तावित आराखडयाबाबत सुधारणा किंवा बदल असल्यास त्वरित जिल्हा नियोजन अधिकारी यांच्याशी संपर्क करुन सुधारणा करुन घेण्यात याव्यात, असे निर्देश श्री. कटियार यांनी दिले.

00000

अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक

 



अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक

          अमरावती, दि. 30 : अप्पर वर्धा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन व अनुषंगिक मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक असून शासनाकडून त्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रशासनस्तरावरील प्रकल्पग्रस्तांच्या दुय्यम प्रमाणपत्रासंदर्भातील मागणी पूर्ण करण्यात आली असून उर्वरित प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसंदर्भात कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली.

            अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात दि. 19 मे 2023 पासून मोर्शी येथे  आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या व त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांच्या दालनात आंदोलनकर्त्यांसोबत विस्तृतरित्या चर्चा झाली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनकर्ते तसेच संबंधित अधिकारी यांच्या समवेत दि. 6 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे बैठक पार पडली. त्यामध्ये आंदोलनकर्ते यांनी त्यांच्या खालीलप्रमाणे पाच प्रमुख मागण्या मांडल्या.

अप्पर वर्धा धरण, 1976 ला नवीन अधिसूचना प्रकाशित होऊन मौजा सिंभोरा येथे करण्यात आले. परंतु भुसंपादन निवाडा सन 1972 च्या अधिसूचनेच्या आधारे निश्चित करण्यात आलेला आहे. त्यामुळे चुकीचा निवाडा दुरूस्त करण्यात यावा. तसेच सर्व प्रकल्पग्रस्तांना लाभक्षेत्र व इतरत्र जमीन देण्यात यावी. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांस 5 टक्के समांतर आरक्षणाची मर्यादा वाढवून ती 15 टक्के करण्यात यावी. एकमुस्त 20 लक्ष रूपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. काही प्रकल्पग्रस्तांना पोष्टाव्दारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पाठविण्यात आले होते. परंतु ते त्यांना मिळाले नाही. तसेच काही प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरी अशा प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र देण्यात यावे, प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या अतिरिक्त जमिनीचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

          बैठकीमध्ये उपरोक्त मागणीच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करण्यात आली. तसेच या मागणीपैकी जिल्हास्तरावर सोडविता येऊ शकतील अशा प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मागणी संदर्भात संबंधिताना निर्देश देण्यात आले. त्याअनुषंगाने सद्यस्थितीत दुय्यम प्रत काही प्रकल्पग्रस्तांना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे अर्ज जसे या कार्यालयास प्राप्त होतील, तसे त्यांना दुय्यम प्रत निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

          जिल्हास्तरावर सोडविता न येऊ शकणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या इतर मागण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दि. 7 व 17 जुलै 2023 रोजीच्या पत्रान्वये शासनास माहिती कळविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनामार्फत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात आंदोलनस्थळी भेट देऊन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा व बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा वेळोवेळी प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसेच शासनासही त्यांच्या मागण्याबाबत सविस्तरपणे कळविण्यात आलेले आहे. प्रकल्पग्रस्तांसमवेत प्रशासनाने संवेदनशीलतेने मागण्या सोडविण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये कुठेही प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत दुर्लक्ष अथवा दिरंगाई करण्यात आलेली नाही. यापुढेही प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिली.

000000


‘ई-पीक पाहणी’ नोंदणीसाठी विशेष मोहिम; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

 


‘ई-पीक पाहणी’ नोंदणीसाठी विशेष मोहिम; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

            अमरावती, दि. 30: महसूल विभागाच्या वतीने खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणीसाठी पिक पाहणी सप्ताह दि. 3 ते 9 सप्टेंबर कालावधीत विशेष मोहिम राबवित आहे. या सप्ताह कालावधीत धामणगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन धामणगांवचे तहसिलदार प्रदिप शेलार यांनी केले आहे.

महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता स्वत:च्या मोबाईल वरून सातबारावर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. खरीप हंगाम 2023 पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.11 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाची प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपव्दारे करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

    जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार धामनणगाव तालुक्यात दि. 3 ते 9 सप्टेंबर 2023 या कालावधीत ई-पीक पाहणी राबविण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये 100 टक्के ई-पीक पाहणी पुर्ण करण्यासाठी सर्व मंडळ अधिकारी व तलाठी हे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांना ई-पीक पाहणी करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच याबाबत महाविद्यालये, ग्रामपंचायत तत्सम शासकीय कार्यालयामध्ये ई-पीक पाहणी प्रशिक्षण व प्रबोधन बाबत कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक हे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीव्दारे नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे. खरीप हंगामासाठी विशेष मोहिम कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. जेणेकरून शासनाच्या पीक विमा, पी. एम. किसान, तारण कर्ज , अतिवृष्टी नुकसान भरपाई, गारपीट नुकसान भरपाई या योजनांचा लाभ घेणे सुलभ होईल.

00000

Monday, August 28, 2023

खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 खरीप हंगाम पिकस्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

 

 

अमरावती, दि. 28: जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, यासाठी पिक स्पर्धा खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

 

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

        पिकस्पर्धेची ठळक वैशिष्टे व बाबी :

•         पीकस्पर्धेसाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे.

•         स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.300 व आदिवासी गटासाठी रक्कम रु. 150 राहिल.

•         स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी  शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या  नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे  आवश्‍यक आहे. स्पर्धेत भाग घेणा-या शेतक-याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.

 

•         पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेसाठी  सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची  भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 आर (1 एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

•         पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतक-यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

 

 

अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -

१) विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)

२) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन

३) 7/12, 8-अ चा उतारा

४) जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)

५) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा

६) बँक खाते चेक, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत

 

 पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप-  सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी राज्य, जिल्हा व तालुका पातळीवरील पीकनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षीस रक्कम याप्रमाणे :  तालुका पातळीवर पहिले बक्षिस 5 हजार रूपये, दुसरे बक्षिस 3 तीन हजार रूपये, तिसरे बक्षिस 2 हजार रूपये, जिल्हा पातळीवर पहिले बक्षिस 10 हजार रूपये, दुसरे बक्षिस 7 हजार रूपये, तिसरे बक्षिस 5 हजार रूपये, तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षिस 50 हजार रूपये, दुसरे बक्षिस 40 हजार रूपये व तिसरे बक्षिस 30 हजार रूपये याप्रमाणे वितरीत करण्यात येईल.

 

खरीप हंगाम सन 2023 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त कृषी सुनील चव्हाण यांनी केले आहे. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा


विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक,

पत्नी व पाल्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

            अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नींना यांच्या पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी दि. 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व कागद पत्रासह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवळ यांनी केले आहे.

माजी सैनिक, विधवा पत्नींना यांच्या पाल्यांना इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त मार्क प्राप्त झाले आहेत व ज्या पाल्यांचा चालू वर्षात आयआयएम,  आयआयटीए, आयआयएमएस तसेच कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, अंतर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा सर्व माजी सैनिक पाल्य, माजी सैनिक, माजी सैनिक वीर पत्नी यांनी जिल्हा सैनिक अमरावती येथून अर्ज घेऊन सर्व कागद पत्रासह अर्ज सादर करावा.

00000

प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; वाहनचालकांसाठी दि. 30 व 31 ऑगस्टला आरोग्य तपासणी शिबिर

 प्रादेशिक परिवहन विभागाचा उपक्रम; वाहनचालकांसाठी

दि. 30 व 31 ऑगस्टला आरोग्य तपासणी शिबिर

 

अमरावती, दि. 28: वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावतीच्या वतीने दि. 30 व 31  ऑगस्ट रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात वाहन चालकांचे रक्तदाब बीपी,  मधुमेह सुगर,  नेत्र तपासणी व हृदय स्पंदन ईसीजी  इतर बाबींची तपासणी करण्यात येणार आहे. तरी  वाहन चालकांनी आपले आरोग्य तपासणी शिबीरामध्ये करून घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले आहे.

 

डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती व महामार्ग पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जुना बायपास रोडवरील हॉटेल तंदुरी नाइट्स व लोणी परिसरातील हॉटेल्स व ढाबे या ठिकाणी  रात्री 7 ते 11  या वेळेत  येणाऱ्या वाहन चालकांचे आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीनंतर वाहनचालकात गंभीर दोष आढळल्यास त्याला त्याबाबत शिफारस पत्र देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येईल.

 

दिवसेंदिवस रस्ते अपघात ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने दरवर्षी लाखो व्यक्ती रस्ते अपघातात आपला जीव गमावत आहे.  तर कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते अशा व्यक्ती अथवा त्यांच्या कुटुंबांना अनेक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ता सुरक्षा ही परिवहन विभागाच्या महत्त्वाची जबाबदारी आहे. यासाठी  परिवहन विभागामार्फत रस्ते सुरक्षा संदर्भात वाहन चालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्यांचे संपूर्ण आरोग्य तसेच वाहन चालकांच्या दृष्टीस अती महत्त्व आहे. चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टीदोष असेल तर वाहन चालविताना त्याला अडचणी येत असतात. परिणामी अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. वाहनचालकांनी आपले आरोग्य तपासणी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000



कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 



कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा

-        जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील भौगोलिक, परंपरागत व्यवसाय व नवीन तंत्रज्ञानाचा आधारे रोजगार व स्वयंरोजगारासाठी मागणी लक्षात घेवून कौशल्य प्रशिक्षण आराखडा तयार करा. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे दिले.

            कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, समाजकल्याणचे सहायक आयुक्त  माया केदार, कामगार उपायुक्त संगिता गुल्हाणे, संत गाडगेबाबा विद्यापीठचे अंकिता पाडोले, अनिल कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.

            ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामस्तरावर प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण भागाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवावे. विविध औद्योगिक संघटना, शासकीय विभाग यांच्या समन्वयाने कौशल्य विकास आराखडा तयार करावा. स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य प्रशिक्षणे उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

            महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या  नाविन्यपुर्ण संकल्पनांना योग्य व्यासपीठ  उपलब्ध व्हावे यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज ’  राबविण्यात येत असुन महाविद्यालयांनी नोंदणी करून अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग मिळवून द्यावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी आज येथे केले.

0000

 

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबत खेळातही सहभागी व्हा;जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

 



















तीन दिवसीय व्हॉलीबॉल संमेलनाचा थाटात शुभारंभ;

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबत खेळातही सहभागी व्हा;जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे आवाहन

       देशातील 576 खेळाडूंनी घेतला सहभाग

 

अमरावती दि. 28 : विद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत खेळालाही महत्त्व द्यावे. खेळामुळे आपल्यातील सांघिक वृत्ती वृद्धिंगत होते. समूहात काम केल्यामुळे इतरांच्या विचारांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढते. तसेच खेळामुळे चांगले आरोग्यही लाभते. यामुळे प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार विविध खेळ प्रकारामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 

जवाहर नवोदय विद्यालयाव्दारे आयोजित 31 व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलनाचे उद्घाटन विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. जवाहर नवोदय विद्यालयाचे सहायक आयुक्त व क्लस्टर इंचार्ज डॉ. ए. एस. सावंत,  अमरावती विभागीय क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनन्या राय, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ससिंद्र सी.के., अकोल्याचे प्राचार्य रवींद्र चंदनशिव, सचिन खरात, नितीन शॉरीक, रवींद्र राऊत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव तुषार देशमुख, व्हॉलीबॉल संघटनाचे सचिव संजय बडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

खेळांचे महत्त्व विशद करताना श्री.कटियार म्हणाले की, खेळाच्या माध्यमातून अर्थाजनासह  प्रसिद्धीही कमविता येते. यासाठी खेळाडूची जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाची तयारी असली पाहिजे. खेळाडूने शिस्तीचे पालन केल्यास कोणत्याही क्रीडा प्रकारात यश मिळविणे अशक्य नाही. स्पर्धेच्या युगात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी खेळाला महत्त्व द्यावे. शारिरिक व मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी आपल्या आवडीच्या क्रीडा प्रकारात सहभागी व्हावे. खेळ आपल्याला सांघिक वृत्ती शिकवितो. विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातील यश देशासाठी गौरवास्पद ठरते. त्याचा लाभ खेळाडूंना विविध क्षेत्रात काम करताना निश्चितच होतो.

 

 पालकांनी पाल्यांना अभ्यासासोबतच खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच मुलींनी क्रीडा क्षेत्रात पदार्पण करताना संकोचित होऊ नये. यासाठी पालकांसह शिक्षकांनीही  मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यानी यावेळी केले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध राज्यातून आलेल्या खेळाडूंनी मंचावर आलेल्या पाहुण्यांना साखळी पद्धतीने पोलीस बँड पथकाच्या शिस्तबद्ध संचालनाने त्यांचे स्वागत केले. मशालीने क्रीडा ज्योत प्रज्ज्वलित  करुन क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी खेळाडूंनी सामूहिक नृत्याव्दारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. जिल्हाधिकारी यांनी यावेळी खेळाडूंना प्रामाणिकपणा, खेळाडू वृत्ती, सवंगड्यांशी मैत्री व उत्साहपूर्वक निकोपपणे खेळ खेळण्याची शपथ दिली.

 

            राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा जिल्ह्यात प्रथमच होत असून ही स्पर्धा गुरुवार दि. 30 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेमध्ये आठ विभागातील म्हणजेच देशातील भोपाल, चंडीगढ, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, पटना, पुणे व शिलाँग या विभागातील 576 खेळाडू तसेच 64 एस्कॉर्ट्स व अधिकारी या स्पर्धेत सहभागी  झाले आहेत. स्पर्धेचे सर्व मॅचेस लिग कम नॉकआऊट पद्धतीने होणार  आहे, अशी माहिती प्रास्ताविकेतून प्राचार्य ससिंदरन सी.के. यांनी दिली.

 

कार्यक्रमाचे विविध भाषांमधून संचलन नवोदय विद्यालयाचे शिक्षक श्रीराम सिंग, अनिरुद्ध सकलकळ, विद्यार्थी धनंजय ठाकरे व विद्यार्थिनी गाथा रामटेके यांनी केले. आभार प्रदर्शन रविंद्र राऊत यांनी मानले.

0000000

 

Sunday, August 27, 2023

रक्तदान चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे - मनपा आयुक्त देविदास पवार

 












रक्तदान चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे

-         मनपा आयुक्त देविदास पवार

रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न

 

          अमरावती, दि. 27 : मानवी शरीरातील रक्त व रक्त घटके ही कोणत्याही कारखान्यात तसेच वनस्पतीपासून निर्माण होत नाही. केवळ मानवी शरीरातून मिळणारे रक्त हेच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी कामी पडते. यासाठी सातत्याने रक्तदान शिबीरांच्या आयोजनातून रक्त संकलित होणे आवश्यक आहे. रक्तदानाची ही चळवळ अखंडपणे सुरु राहण्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फुर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी आज येथे केले.

           जिल्हा सामान्य रुग्णालय, विभागीय रक्तपेढी व रक्तघटक विलगीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सामाजिक न्याय भवनात रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र सोळंके, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील, रक्तपेढी प्रमुख आशिष वाघमारे, रक्त संकलन अधिकारी डॉ. संदेश हेमलवाड, जनसंपर्क अधिकारी मिलींद तायडे तसेच विविध संस्थेचे शिबिर आयोजक आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान असून प्रत्येकाने रक्तदान करणे आवश्यक आहे. मनुष्याचे जीवन वाचविण्यासाठी रक्त हा घटक अत्यंत आवश्यक असते. रक्त संकलन करण्यासाठी समाजातील अनेक रक्तवीर व विविध स्वयंसेवी संस्था शिबीरांचे आयोजन करीत असतात. त्यांनी केलेल्या रक्तसंकलनातून अनेकांचे प्राण वाचविण्यास मदत होते. अश्या या जीवनदान देणाऱ्या रक्तवीरांचा सत्कार व गौरव जागतिक रक्तदिना निमित्त करण्यात आला. समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या रक्तवीरांच्या सत्काराने त्यांचे हे विधायक काम अविरत सुरु ठेवण्यास प्रोत्साहन मिळते.  अतितातडीच्या प्रसंगी गरजूंना रक्त पुरवठा उपलब्ध करुन देण्यात महत्वपूर्ण काम विभागीय रक्तपेढीच्या माध्यमातून होते. हे काम अविरतपणे सुरु राहण्यासाठी शिबीरांच्या आयोजनातून अधिक प्रमाणात रक्त संकलन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

            याप्रसंगी श्री. पवार यांनी त्यांच्या मुलाच्या आजारपणातील प्रसंग विशद करुन रक्ताचे व रक्तदानाचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. रक्तदात्या मुळेच त्यांच्या मुलाचे प्राण वाचू शकले. तेव्हापासून त्यांनी रक्तदानाचे महत्व इतरांना पटवून देऊन नियमित रक्तदान केल्याचे सांगितले. जीवनावश्यक घटकापैकी रक्त हे एक महत्वाचा घटक असून प्रत्येकाने नियमितपणे रक्तदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

दीडशे रक्तदान शिबिर आयोजकांचा सत्कार

यावेळी 150 रक्तदान शिबिर आयोजकांचा प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राजकुमार दासरवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, प्रा. आशिष भोपळे, प्रा. आशिष सायवान, वंदे मातरम फाउंडेशनचे श्री. दापुरकर व त्यांची चमू, बळवंत वानखडे, दयाराम जावरकर, अमरावती रक्तदान समितीचे प्रा. संजय कुलकर्णी, राकेश ठाकूर, श्याम शर्मा, मोहन लढ्ढा, उमेश पाटणकर, अरण्य फाउंडेशनचे श्रेयस पन्नासे आदींचा प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            जिल्हा सामान्य रुग्णालयाची रक्तपेढी ही जिल्ह्यासह विभागातही रक्त पुरवठा करते. पश्चिम विदर्भातील ही एकमेव शासकीय रक्तपेढी असून 1990 पासून कार्यरत आहे. विभागातील सिकलसेल, थ्यालेसीमिया, हिमोफिलीया या आजारग्रस्तांना तसेच गरजूंना आवश्यकतेनुसार रक्तपेढीव्दारे रक्त पुरवठा केल्या जातो. या रक्तपेढीत शिबीरांच्या आयोजनातून वर्षाला सोळा हजार रक्त पिशव्या रक्त संकलित केल्या जाते, अशी माहिती डॉ. संदेश हेमलवाड यांनी प्रास्ताविकातून दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिलींद तायडे यांनी केले तर योगेश पानझाडे यांनी आभार मानले.

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...