महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणेसह
अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्यास मान्यता
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणेसह अध्यादेश पुनर्प्रख्यापित करण्यास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतमान्यता देण्यात आली.
यासंदर्भात राज्यपालांनी 19 जुलै 2017 रोजी काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात आले होते. मात्र, अधिवेशन 11 ऑगस्ट 2017 रोजी संस्थगित झाल्याने ते मंजूर होऊ शकले नाही. या अध्यादेशातील तरतूदी सुरु राहाव्यात यासाठी तो 1 सप्टेंबर 2017 रोजी पुनर्प्रख्यापित करण्यात आला. संबंधित विधेयक विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकात विधानपरिषदेतील सदस्यांनी सूचविलेल्या सुधारणांप्रमाणे संमती देण्यात आली. मात्र, सुधारणा केलेले विधेयक विधानसभेमध्ये ठेवण्यापूर्वीच अधिवेशन 22 डिसेंबर 2017 रोजी संस्थगित झाल्याने त्यास संमती मिळू शकली नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या अध्यादेशाची मुदत 21 जानेवारी 2018 रोजी संपत आहे. अध्यादेशातील तरतुदी यानंतरही चालू राहण्यासाठी तो नव्याने पुनर्प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांना विनंती करण्यास आज मान्यता देण्यात आली.
-----०-----
Comments
Post a Comment