ग्राहकांचे प्रबोधन आणि हक्कासाठी
लढा देणारे कार्यकर्ते हे ‘ग्राहक योद्धे’ आहेत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.9; ग्राहकांचे प्रबोधन करणे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देणारे कार्यकर्ते हे ग्राहक योद्धे आहेत, ग्राहकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. आज ग्राहक दिनानिमित्त ग्राहक चळवळीत उल्लेखनिय काम करण्यार-या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ग्राहक जागृतीसाठी विविध पातळीवरुन कार्य होत आहे, ग्राहकांच्या हितासाठी संघर्ष करणारे ग्राहक योद्धयांच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळत असतो. बाजारातल्या बदलांचा परिणाम हा ग्राहकांवरही होत आहे. थेट मार्केटिंग , ऑनलाईन मार्केटिंग या क्षेत्रात होणारी फसवणूक टाळता यावी यासाठी प्रबोधन करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी, ग्राहक हा राजा मानून त्याची फसवणूक होऊ नये याबाबत सर्व स्तरावरून प्रबोधन करण्याचे आवाहन केले. ग्राहक चळवळीत अधिकाधिक लोकांनी सक्रीय व्हावे असेही त्यांनी सांगितले.
मान्यवरांचा सत्कार
ग्राहक चळवळ आणि माहिती अधिकाराद्वारे समाजकार्य करत असणाऱ्या 9 मान्यवरांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, यात श्रीमती स्वाती विजय भागवत, ( ग्राहक पंचायत कार्यकर्त्या) मु.पो.मंडणगड, जि. रत्नागिरी. धनंजय रावसाहेब गायकवाड ( ग्राहक पंचायत कार्यकर्ते) ता.शिरुर जि.पुणे. संपत जळके. ( ग्राहक पंचायत कार्यकर्ते) तुळजापूर जि.उस्मानाबाद. श्रीमती तृप्ती महेंद्र आकांत. ( ग्राहक पंचायत कार्यकर्त्या) श्रद्धानंद पेठ, नागपूर. जयप्रकाश शालिग्राम पाटील. (ग्राहक पंचायत कार्यकर्ते) अकोला. राघवेद्र प्र.यजुर्वेदी (राव) (माहिती अधिकार कार्यकर्ते) साकिनाका, अंधेरी (पू) श्रीमती इंद्राणी मलकानी, मुंबई (सामाजिक कार्यकर्त्या )भगवान कारीया, मुंबई ( सामाजिक कार्यकर्ता व माहिती अधिकार पाठपुरावा कर्ते )डॉ.मनोहर कामत, मुंबई (ग्राहक चळवळ कार्यकर्ते) यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गणितात विशेष पारितोषिक मिळवणा-या अकरा वर्षाच्या अभिषेक अजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण मंत्री गिरीश बापट, अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, नियंत्रक शिधावाटप व संचालक दिलीप शिंदे, अपर पोलीस महासंचालक तथा नियंत्रक वैद्यमापन शास्त्र अमिताभ गुप्ता, राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्या.ए. पी. भंगाळे उपस्थित होते. मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात ग्राहक जागृतीसंदर्भात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रीय ग्राहक पंधरवाडा समारोप कार्यक्रम आणि प्रदर्शन
• ग्राहक संरक्षण क्षेत्रात विभागामार्फत अनेक पातळयांवर काम होत आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करुन द्यायला स्वयंसेवी संस्था,ग्राहक कल्याण समिती, राज्य ग्राहक संरक्षण परिषद आणि जिल्हयातील ग्राहक परिषदा शासनाबरोबरच ग्राहक जागृतीची चळवळ प्रभावी होण्यासाठी काम करीत असतात. मंत्रालयात आजचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे या सर्वांची सांगड घालून सामान्य नागरिकांना त्यांच्या कामाची कामाची ओळख करुन देणे आणि ग्राहक म्हणुन त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायावर दाद मागण्याकरिता अस्तित्वात असलेल्या सर्व पर्यायांची एकाच ठिकाणी गाठभेट घालून देणे हा उद्देश होता.
• या वर्षाच्या ग्राहक संरक्षणाची थीम,” Emerging Digital Markets : Issues & Challenges in Consumer Protection” अशी आहे. टेक्नॉलॉजी प्रगत होत असल्याने ती समजून घेऊन स्मार्ट बनणे ही काळाची गरज आहे. ऑनलाईन खरेदी करताना, सोशल मीडियाचा वापर करतांना काळजी घेणे आवश्यक असून आज या प्रदर्शनात सायबर पोलीस यांच्यातर्फेही एक स्टॉल लावण्यात आला होता.
• दुकानदारा मार्फत खरेदी न करता डायरेक्ट सेलींगने ग्राहकांची फसवणूक होण्याच्या तक्रारी वाढल्याने ग्राहक संरक्षण विभागातर्फे एक पोर्टल तयार करण्याची योजना आहे. याकरिता इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन शासनास मदत करत आहेत.
• ग्राहकांना ताकद देण्यासाठी विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. संगणकीकृत पॉस मशिनद्वारे आधार ओळख, द्वारपोच योजना इ.बरोबरच वजनमापे विभागाचे संगणकीकरण, ग्राहक मंचाकडे तक्रारीसाठी संगणकीकृत यंत्रणा, सेवाहक्क कायद्याअंतर्गत जास्तीत जास्त सेवा,परवाने ऑनलाईन पद्धतीने देण्याची सुरुवात झालेली असून रेशनकार्ड, अन्न औषध प्रशासनातील परवाने ऑनलाईन देण्यात येत आहेत.
• नवीन ग्राहक संरक्षण 2018 चे जे विधेयक लोकसभेत सादर झाले आहे त्यात देखील ग्राहक संरक्षणाच्या बदलत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, यु.एन.गाईड लाईन्स इ.चा विचार करण्यात आलेला आहे.
• गेल्या महिन्यात एक केंद्रीय ग्राहक संरक्षण ॲथोरिटीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. नवीन कायद्यामध्ये नमूद असलेल्या महत्वाच्या बाबींमध्ये ग्राहकांना भुलवणाऱ्या व खोटया जाहिराती करणाऱ्या कंपनी आणि या जाहिरातीत काम करणारे सेलेब्रीटी यांच्यावर कारवाईची तरतुद आहे. तसेच अन्न भेसळीने इजा झाल्यास कठोर कारवाई, दंड,कारावास अशा शिक्षांची तरतूद आहे. तसेच ऑनलाईन खरेदीत फसवणूक झाल्यास कुठेही इलेक्ट्रानिकली तक्रार करता येणार आहे.
• आज या प्रदर्शनात अखिल भारतीय ग्राहक पंचायत, वैधमापन विभाग, अन्न नागरी पुरवठा विभाग,अन्न व औषध प्रशासन विभाग, एमटीएनएल,बेस्ट,पेट्रोलियम कंपन्या,सायबर पोलीस,ग्राहक मंच,ऑनलाईन तक्रार करण्यासाठी इन सोलूशन कंपनी, कंन्झुमर्स गाईडन्स सोसायटी ऑफ इंडिया इ.नी आपले स्टॉल लावून शासनाच्या ग्राहक जागृतीच्या अभियानात भाग घेतला आहे.
००००
Comments
Post a Comment