योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशनमोडवर काम करा - सौरभ कटियार
‘विकसित
भारत संकल्प यात्रे’चा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;
योजनांची
माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी मिशनमोडवर काम करा
- सौरभ कटियार
अमरावती, दि. 08 (जिमाका):
शासनाच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचावे, यासाठी
केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने ‘विकसित भारत संकल्पना यात्रा’ ही मोहिम राबविण्यात
येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत
मिशन मोडवर पोहोचविण्याचे काम संबंधित यंत्रणांनी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी
सौरभ कटियार यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विकसित
भारत संकल्प यात्रा मोहिमेची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली
भारत सरकार वित्त मंत्रालयाचे उपसचिव आदित्य भोजगढिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती
होती. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पंकज
कुमार, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस,
मनपाचे उपआयुक्त डॉ. मेघना वासनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते तसेच
विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
श्री. कटियार म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा ही मोहीम जिल्ह्यात
दि. 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत 575 गावांमध्ये ही यात्रा पोहोचली
असून शासनाच्या विविध योजनाचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. उर्वरित 266 गावामध्ये
यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळेल, यासाठी सुक्ष्म नियोजन
करावे. गावपातळीवर लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांचे सहकार्य घेण्यात यावे. ज्या लाभार्थ्यांना
लाभ दिला आहे, त्यांची माहिती केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर नियमित अपलोड करावी. आगामी निवडणुक आचारसंहिता लक्षात घेऊन मिशन मोडवर
यंत्रणांनी केंद्र सरकारच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असेही
ते यावेळी म्हणाले.
उपसचिव श्री. भोजगढीया म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रा ज्या
गावामध्ये जाणार आहे, त्या गावातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची
माहिती व्हावी, यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात यावा. जेथे लाभार्थ्यांनी अद्यापही
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतला नाही, त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती
प्रभावीपणे पोहोचवावी. यासाठी युवा वर्ग, महिला बचत गट व विद्यार्थ्यांना सहभागी करून
घ्यावे. जिल्ह्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती प्रभावीपणे
पोहोचविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
000000
Comments
Post a Comment