अमरावती, दि. 28 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. शासनाकडून विविध उपायांची अंमलबजावणी सातत्याने होत आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना
दुकानांवर नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी दुकानांकडून घरपोच सेवा सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेकडून दुकानांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळणार आहेत.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या निर्देशानुसार, अमरावती महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध भागातील किराणा दुकाने, भाजी आणी फळ व्यापारी यांचे मोबाईल नंबर जाहीर केले आहेत.
त्यामुळे शहरातील नागरिकांना जीवनावश्यक सामान खरेदीकरिता घराबाहेर जाण्याची गरज नाही.
नागरिकाच्या सुविधेसाठी जीवनावश्यक वस्तू विक्री विविध केंद्रांची प्रभागनिहाय यादीच मोबाईल क्रमांकासह प्रशासनाने उपलब्ध केली आहे. या यादीप्रमाणे नागरिक आपल्या परिसरातील दुकानदाराला मोबाईल नंबरवर फोन करून किंवा त्यांना व्हाटस ॲपद्वारे संदेश पाठवून आपल्या गरजेप्रमाणे किराणा, भाज्या आणी फळे घरपोच मागवू शकतील.
नागरिकांनीही अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नये. घरपोच सुविधेचा, तसेच ऑनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment