कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा - जिल्हाधिका-यांचे आवाहन
अमरावती, दि. 20 : परदेशातून आलेले तसेच अशा व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार चौदा दिवसांपर्यंत स्वतःच्या घरातील विलगीकरण कक्षात (स्वतंत्र खोलीत) राहणे आवश्यक आहे. घरी राहत असताना कोणत्याही आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य विभागास कळवावे. तसेच प्रशासनाकडून फोनवर विचारण्यात येणारी माहिती अचूक सांगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झालेला असून या कायद्यानुसार बाहेरून आलेल्या व्यक्तीने
सहकार्य करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींना चौदा दिवसांपर्यंत होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्याशी प्रशासनाकडून वेळोवेळी संपर्कही करण्यात येत आहे. मात्र, सूचनांचे पालन व प्रशासनाला अचूक माहिती देणे आदी सहकार्य न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते याची जाणीव संबंधितांनी ठेवावी. स्वतःची, स्वतःच्या कुटूंबाची व जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी व साथरोग प्रसारास आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग उपायांविषयी काही माहिती हवी असल्यास संबंधितांनी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मोबाईल क्र.9356745542 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment