गरजूंना अन्नदानासाठी संस्थांना परवानगी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती, दि. 27 : शहरातील गरीब व गरजू व्यक्तींना स्वखर्चाने भोजन वितरीत करण्यासाठी विविध संस्था, व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. तथापि, भोजन वितरीत करताना दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून, गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संचारबंदी आदेशामुळे शहरात असलेल्या बेघर, भिक्षुक, हातमजुरी करून पोट करणारा वर्ग, रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा विविध वर्गातील लोकांना भोजनाची व्यवस्था करणे आवश्यक झाले आहे. त्या अनुषंगाने आज विविध ठिकाणी गरजू व गरीब व्यक्तींना भोजन देऊ इच्छिणा-या संस्थांची बैठक घेण्यात आली व तशी परवानगी देण्यात आली.
जिल्हा सामान्य रूग्णालयात जलाराम ग्रुपतर्फे, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उमेश पनपालिया, सीमेश श्रॉफ मित्र मंडळातर्फे, जिल्हा स्त्री रूग्णालयात गुरूद्वारा समितीतर्फे, बडनेरा रस्त्यावरील महेशभवन येथे बालाजी मंदिर ट्रस्टतर्फे, बडनेरा रस्त्यावरील भक्तीधाम येथे जयेश राजा यांच्यातर्फे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे हरीना फौंडेशन व रोटरी क्लबतर्फे, वलगाव येथे महेश्वरी पंचायतीतर्फे, दस्तुरनगर चौकातील पोफळीभवन येथे जेसीआयतर्फे, बडनेरा रेल्वेस्थानकाजवळील शेल्टर होम येथे हॉटेल असोसिएशनतर्फे, ख्रिश्चन अँड मिशनरी अलायन्स येथे टी. एस. लव्हाळे यांच्यातर्फे दररोज गरजू व्यक्तींना स्वखर्चाने भोजन पुरविण्यात येणार आहे. त्यांना त्यासाठी परवानगी देण्यात आली असून, याठिकाणी दोन व्यक्तींमध्ये जागा ठेवावी व गर्दी होणार नाही, अशी सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अजय लहाने यांनी दिली.
संबंधितांना कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री. लहाने यांनी केले आहे.
Comments
Post a Comment