जिल्ह्यात 25 हून अधिक शिबिरांतून तेराशे नागरिकांकडून रक्तदान

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी
            अमरावती दि.27: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि रक्ताची गरज लक्षात घेता ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ हे बोधवाक्य कृतीतून अंगीकारण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात 25हून अधिक शिबिरे आयोजित करण्यात येऊन त्याद्वारे 1 हजार 310 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोविड-19 या आजाराने जगभरात थैमान मांडले आहे. देशात व राज्यातही या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली होती. मात्र, रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळून व इतर दक्षता घेऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय आरोग्य व महसूल प्रशासनाने घेतला. संचारबंदीचा भंग न करता, पण काळाची गरज लक्षात घेऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. म्हणून सोशल डिस्टन्सिंग आणि शिस्त पाळून रक्तदान करावे. शासनाच्या  नियमांचे पालन करून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तपेढ्या वा रक्तदान शिबिरे संकलनाचे काम करत आहेत. म्हणूनच गटाने एकत्र बाहेर न पडता, एकट्याने जाऊन रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावती जिल्ह्यातील विविध शासकीय कर्मचारी संघटना, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला व संचारबंदीच्या काळात 25 हून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यातून 1 हजार 310 रक्तदात्यांनी रक्तदान केले. जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन टप्याटप्याने; पण नियमितपणे करण्यात येत आहे. त्यानुसार दि. 7 मेपर्यंत आणखी 11 शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे रक्ताची  गरज असलेल्या  रुग्णांना वेळेत रक्त पुरविण्यास मदत होणार आहे.
लॉकडाऊनचा फटका रक्तपेढ्यांना बसू नये, यासाठी ही शिबिरे नियमितपणे घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या समन्वयातून शासकीय कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना यांनी शिबिरांच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार,  जिल्ह्यामध्ये दररोज  25 ते 30 रुग्णांना रक्ताची गरज असते. गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, गर्भवती माता, स्तनदा माता, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, तसेच, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. थॅलेसिमिया, सिकलसेल आणि हिमोफिलियाच्या रुग्णांना नियमितपणे रक्त संक्रमण करून घ्यावे लागते.  थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्ताची सर्वात जास्त गरज भासते. अशा रूग्णांमध्ये 15 ते 21 दिवसांनी रक्त संक्रमण करून नवीन रक्त देण्याची गरज असते. अशावेळी रक्त संक्रमण करताना अनेकदा एक युनिट रक्त पुरत नाही. वयाने मोठ्या रुग्णांना 2 युनिट्स रक्तही लागू शकते. प्रत्येक रुग्णासाठी हे प्रमाण वेगवेगळे असते आणि ही प्रक्रिया आयुष्यभर नियमितपणे करावी लागते. केवळ थॅलेसिमियाग्रस्तच नव्हे, तर इतरही विविध आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज असते. शस्त्रक्रिया, अपघात, डिलीव्हरीज या सगळ्यासाठी ब्लड बँकेत रक्त असणे  गरजेचे असते. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अनेकदा शंकाकुशंका व्यक्त होत असतात. सध्याच्या परिस्थितीत रक्तदान  कितपत सुरक्षित आहे, असेही विचारले जाते. मात्र, पुरेशी काळजी घेतली तर सुरक्षितपणे रक्तदान करता येणे शक्य आहे, असे जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर यांनी सांगितले.
राज्यातील रक्तपेढ्यांची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (SBTC) च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर आपल्याला जवळच्या रक्तपेढीला फोन करून त्यांची गरज जाणून घेता येते. रक्तपेढीला गरज असल्यास आपल्या प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय माहिती आदी विचारून व तपासून आपल्याला वेळ दिली जाते. तसा संदेश पेढीकडून आपल्याला प्राप्त होतो. हा संदेश पोलिसांना दाखवून संचारबंदी असली तरी रक्तदानासाठी जाण्याची मुभा आहे, असे श्री. आगरकर म्हणाले.
 
000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती