पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडून गरजूंना किराणा व धान्य वाटप
जीवनावश्यक वस्तू मिळण्यापासून कुणीही वंचित राहू नये
अमरावती, दि. 02 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी तिवसा येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तिवसा येथे आनंदवाडी परिसरातील गरजू व विधवा महिलांना किराणा व धान्य वाटपही त्यांच्या हस्ते यावेळी झाले.
जीवनावश्यक वस्तू मिळण्यापासून एकही नागरीक वंचित राहू नये असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठिकठिकाणी घरपोच सेवा सुरु व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांचे निर्देश आहेत. या काळात नागरीक घराबाहेर पडू नये यासाठी विविध सेवा घरपोच तसेच ऑनलाईन सेवा सुरळित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तथापि, या काळात गरीब नागरीकांची गैरसोय होऊ नये. कुणीही किराणा, धान्य, जीवनावश्यक वस्तू आदींपासून वंचित राहू नये. शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमध्ये तांदूळ व इतर जीवनावश्यक वस्तू पुरवठा होत आहे. त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेत आहेत. मात्र सद्यस्थितीत रोजगार उपलब्ध नसल्याने गोरगरीब नागरीकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवठा करण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन आनंदवाडी परिसरातील विधवा महिला, गोरगरीब व गरजू नागरीकांना किराणा व धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जीवनावश्यक वस्तू मिळण्यापासून कुणीही वंचित राहू नये. कुणालाही कुठलिही अडचण आल्यास संपर्क साधावा. कुणीही वंचित राहणार नाही यासाठी शासन कटिबद्ध आहे.
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी तसेच चढ्या भावाने विक्री झाल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
नगराध्यक्ष वैभव वानखडे,उपसभापती शरद वानखडे, नगरसेवक दिवाकर भुरभुरे,संध्या पखाले,हिमानी भोसले,शिवा तिखाडे,रवींद्र हांडे, संदीप आमले, लोकेश केणे, तहसीलदार वैभव फरतारे,मुख्याधिकारी पल्लवी सोटे,पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर उपस्थित होते
00000
Comments
Post a Comment