कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक

लढाई अजूनही संपलेली  नाही        
                

                  शहरात प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी            
-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश
            अमरावती, दि. 24 : एकीकडे चार रूग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची दिलासादायक बातमी असताना दुसरीकडे पुन्हा नव्याने चार व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. लढाई अजूनही संपलेली नाही. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. नागरिकांनीही स्वत:हून माहिती देण्यासाठी व तपासणीसाठी पुढे यावे. कुठलीही माहिती दडवू नये, असे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही शहरात प्रतिबंधात्मक आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
            पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी या रोज जिल्हा प्रशासनाकडून माहिती व आढावा घेत आहेत. येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेल्या चार पॉझिटिव्ह रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याने त्यांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्याबाबत पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, रूग्ण बरे होऊन घरी परतत आहेत, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, पुन्हा नव्याने चार रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, ही चिंता वाढविणारी बाब आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच दक्ष राहणे गरजेचे आहे.   
या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणी अहवाल लवकर मिळावेत व त्यानुसार उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना यांना गती मिळावी यासाठी अमरावती विद्यापीठ परिसरात कोरोना चाचणी लॅब उभारण्यात आली आहे. तेथील तज्ज्ञांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले. आयसीएमआरच्या निकषांनुसार आवश्यक बाबींची पूर्तता केली जात आहे. लवकरच लॅब कार्यान्वित होत आहे. त्यामुळे संशयित रुग्णांच्या थ्रोट स्वॅबचे तपासणी अहवाल स्थानिकरित्या व तत्काळ मिळतील. त्याचप्रमाणे, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातही लॅब लवकरच सुरू व्हावी, यासाठीही प्रयत्न होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 जिल्ह्यात नव्याने कोरोनाचे रूग्ण आढळल्याने संचारबंदी कठोर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार भाजीबाजार व फळयार्ड 27 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. गर्दी टाळणे हा त्यामागील हेतू आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी असे निर्णय घ्यावे लागत आहेत. मात्र, अशा उपाययोजनांतून आपण साथरोगावर नियंत्रण करू शकू.  सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या पवित्र दिवसांत त्यांनी इफ्तार आदी कार्यक्रम घरातच साजरे करून सुरक्षित राहणे आवश्यक आहे. आपल्यावर किंवा आपल्या कुटूंबावर कोरोनासारखे कुठलेही संकट येऊ नये म्हणून मुस्लीम बंधू-भगिनींनी मस्जिदीमध्ये एकत्र न येता, आपल्या घरीच सोशल डिस्टन्सिंग पाळून नमाज अदा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
            लॉकडाऊनच्या काळात संचारबंदीत दिलेली शिथीलता जरी रद्द केली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठ्यात कुठलीही कमतरता येऊ नये, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल आदी सुरुच राहणार आहेत. जिल्ह्यात गोरगरीबांना अन्नधान्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहे. व त्याअनुषंगाने त्यांच्याकडून सुरळीत नियोजनातून अन्नधान्याचा पुरवठा सुरु आहे. त्याशिवाय, संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, फळ, शेती पिक उत्पादित माल ग्राहकांच्या घरपोच पोहचता व्हावा, यासाठी कृषी विभागाने सुरळीत नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकरी ते ग्राहक अशी योजना राबविल्याने मध्यस्थी टळेल, सुरक्षितता राखली जाईल व शेतक-यांनाही त्याचा लाभ होईल. त्यानुसार ग्राहकांना शेतीतील उत्पादित ताजा माल घरपोच मिळू शकेल. कृषी विभागाने यात लक्ष घालून कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
           
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती