अमरावती, दि. 28 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून, तालुक्याचा हद्दीत व ग्रामीण भागात बाहेरुन प्रवास करुन येणाऱ्या नागरीकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात यावे असे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सद्यस्थितीत अमरावती शहरामध्ये वाढत असल्याचे दिसुन येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना लागु करण्यात आल्या आहेत. त्याकरीता जिल्ह्यामध्ये लॉकडॉऊन व संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यात येत असून सर्व शासकीय यंत्रणा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रभावी अंमलबजावणी करत आहेत.
अश्यापरिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात होऊ नये, याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. याकरीता विशेष खबरदारी म्हणून संबंधित तहसिलदारांनी तालुक्याचे हद्दीमध्ये/ ग्रामीण भागामध्ये बाहेरुन प्रवास करुन जे प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा इतर कोणताही नागरीक प्रवेश करेल, अश्या प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा नागरीक याला सक्तीने 14 दिवस इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावे. सदर प्रवासी, मजुर, विद्यार्थी अथवा नागरीक यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याकरीता तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी शासकीय शाळा, वसतिगृहे यांची तपासणी करावी व तपासणी करुन जागेची निश्चिती करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबतचे अंमलबजावणी करीता स्थानिक पोलीस पाटील, स्वच्छता कर्मचारी इत्यादी ग्रामस्तरीय कर्मचारी यांची नेमणुक करावी. याकरीता तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी याबाबतची अंमलबजावणी करीता सुक्ष्म नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
संबंधित तहसिलदार यांनी ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत उपरोक्त प्रमाणे प्रभावी अंमलबजावणी करावी. सदर अंमलबजावणी करतांना यापुर्वीचे मार्गदर्शक सुचनांमधील अटींचे व स्वच्छता, सोशल डिस्टन्सींग इत्यादी गोष्टींचे पालन होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहे.
क्लसटर कंन्टेमेंट झोनमधील नागरीकांनी विनापरवानगी बाहेर पडू नये. तसे केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. कुठल्याही प्रकारची माहिती लपवू नये. कुठलेही लक्षण असल्यास तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment