जिल्ह्यात इंटरनेट सुविधा सुरळीत राहाव्यात - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू असून, या काळात नागरिकांना विविध ऑनलाईन सुविधांचा वापर करता यावा, यासाठी इंटरनेट सुविधा सुरळीत ठेवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
इंटरनेट सेवा पुरविणा-या सर्व कंपन्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन त्यांना इंटरनेट सेवा सुरळीत ठेवण्याबाबत सूचित करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध टाळण्यासाठी नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक आहे. त्यामुळे संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. या काळात शासनाच्या, तसेच इतर विविध प्रकारच्या ऑनलाईन सुविधांचा वापर नागरिकांना करता यावा, यासाठी इंटरनेट सेवा अखंडित राहणे आवश्यक आहे. नागरिकांना घरबसल्या सुविधा मिळावी व कार्यालयात चकरा मारायला लागू नयेत, यासाठी शासनाकडून विविध योजनांची कार्यवाही ऑनलाईन माध्यमातून होते. त्याशिवाय, विविध प्रकारची देयके भरणे, अर्ज व इतर कार्यवाही, आवश्यक सेवा मिळविणे यासाठी नागरिकांकडून ऑनलाईन सेवेचा वापर होतो. त्यामुळे अखंडित वीजपुरवठ्यासह इंटरनेट सेवाही अखंडित राहणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
नागरिकांनीही घराबाहेर न पडता ऑनलाईन सुविधांचा वापर करावा. आपली व आपल्या कुटुंबियांची, तसेच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
Comments
Post a Comment